तुला पाहते रे : झेंडे आपल्या मित्राला प्रेम व्यक्त करण्यापासून रोखणार का?

विक्रांत ईशासमोर प्रेम व्यक्त करणार का?

मुंबई : दिवसेंदिवस लोकांच्या मनात आपुलकीचं स्थान मिळवणारी 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेमाचा नवा अर्थ लोकांपुढे मांडत आहे. नात्यांमधील प्रेम, मैत्रीमधील प्रेम आणि दोन जीवांमधील प्रेम, किती निरागस असतं हे या मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळत आहे. बघा ना, अश्याच मैत्रीच्या प्रेमाची साथ तंतोतंत जपणाऱ्या विक्रांत आणि झेंडे यांच्या जुन्या काळाच्या आठवणींना उजाळा देत या दोघांपासून कालच्या एपिसोडची सुरुवात झाली.

आपला मित्र आपल्यापासून एखादी गोष्ट कितीही लपवत असेल तरी ती गोष्ट खऱ्या मित्राला बरोबर कळते, अगदी तसेच झेंडेंनी विक्रांत हा ईशाच्या प्रेमात पडल्याचे गुपित बरोबर जाणले. पुढे, आपला मित्र प्रेमात पडलाय हे खरं आहे परंतु, त्याच्या एका चुकीने त्याने मोठ्या मेहनतीने कमावलेले सर्व नाव आणि प्रतिष्ठा एका क्षणात धुळीला मिळू शकते त्यामुळे, झेंडेंनी ईशाच्या प्रेमाचं खुळ डोक्यातून काढून टाकण्याचा विक्रांतला सल्ला दिला. तिकडे विक्रांत सोबत आपले लग्न कसे होऊ शकेल या विचारात हरवलेली ईशा विक्रांतच्या मनात नक्की काय दडले असले याच विचारात हरवून जाते.

दरम्यान, पुष्पाला एक जोगतीण सांगते की, कर्जतच्या देवीची ओटी भरलीस तर तुझ्या मुलीचे एका महिन्यात लग्न होईल. पुढे, विक्रांतने ईशाला आपल्या पासून दूर पाठवायचे ठरविले आणि त्यासाठी तिची बँगलोरला ट्रांसफर केली. यशाच्या शिखरावर पोहचलेला विक्रांत आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी ईशाच्या प्रेमाला पूर्णविराम देणार का? हे बघण्यासाठी "तुला पाहते रे" या मालिकेचा पुढील भाग बघायला विसरू नका.