शूटींग संपवून घरी जाताना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अपघात, वॉकरच्या मदतीने चालतानाचा व्हिडीओ समोर

त्यांना गंभीर दुखापत झालेली असतानाही ते काम करताना दिसत आहेत. याबद्दल त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

Updated: Feb 25, 2024, 08:32 PM IST
शूटींग संपवून घरी जाताना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अपघात, वॉकरच्या मदतीने चालतानाचा व्हिडीओ समोर title=

Chandrakant Kanse Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला आळखले जाते. गेल्या साडेतीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत सध्या गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेच्या दिग्दर्शकाचा अपघात झाला आहे. या मालिकेतील एका अभिनेत्याने याबद्दलची माहिती दिली आहे. 

अभिनेता मयूर पवार हा या मालिकेत लवली हे पात्र साकारत आहे. त्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत या मालिकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे वॉकर घेऊन काम करत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच ते एका बेडवर झोपल्याचेही दिसत आहे. यावेळी त्यांना गंभीर दुखापत झालेली असतानाही ते काम करताना दिसत आहेत. याबरोबर त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

मयूर पवारची इन्स्टाग्राम पोस्ट

नमस्कार. ह्या लेखातल्या भावना संपूर्ण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ टीमच्या भावना आहेत. तर, आपल्या ह्या लाडक्या मालिकेचं दिग्दर्शन श्री. चंद्रकांत कणसे सर करतायत. खरं तर चंदू सरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. अनेक मालिका, तर झालं असं की, मागच्या महिन्यात शूट संपवून घरी जात असताना चंदू सरांचा अपघात झाला.सरांना ४ आठवडे बेडरेस्ट सांगितली. चंदू सरांचं कामाबद्दल इतकं कमालीचं डेडीकेशन आहे की ते कधी सेटवर असताना सुद्धा बसत नाहीत. सीन कसा चांगला होईल ह्या किंवा लिहून आलेल्या सीन मध्ये आपण अजून काय करू शकतो ह्या विचारात ते सेटवर सतत येरझाऱ्या घालत असतात. आम्ही चंदू सरांना फक्त ब्रेक झाल्यावर जेवताना बसलेलं बघितलंय. त्या आधी किंवा त्या नंतर हा माणूस कधीच बसलेला दिसत नाही. जसजसे ४ आठवडे पूर्ण होत होते तसतशी चंदू सरांची कामाबद्दलची तळमळ वाढत होती. ते सतत सेटवर फोन करून सीन कसा करायला पाहिजे ह्याबद्दल शशी सरांशी चर्चा करत होते. शशी सर हे आपल्या मालिकेचे सह दिग्दर्शक. 

चंदू सरांच्या अनुपस्थितीत शशी सरांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सेट हाताळला आणि सर्व कलाकारांना हाताशी धरून मालिकेचं शूटिंग तितक्याच जोमात सुरू ठेवलं. ह्या दरम्यान एक प्रोमो शूट करायचा होता जो खूप महत्वाचा होता. हे कळल्यावर चंदू सरांना राहवेना. काहीही झालं तरी हा प्रोमो आपणच करायचा असं चंदू सरांनी ठरवलं आणि सेटवर फोन करून ‘मी येतोय’ असं सांगितलं. कामाप्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा चंदू सरांना सेटपर्यंत घेऊन आली. सर सेटवर येताच स्पॉट दादांपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण खुश झाला आणि प्रत्येकात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. सरांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. दिग्दर्शकासाठी संपूर्ण टीम इतकी राबत असल्याचं, मालिकेच्या सेटवर खूप कमी पहायला मिळतं. चंदू सरांनी इतर कुठलाही विचार न करता, सेटवर येऊन प्रोमो दिग्दर्शित केला आणि नेहमीप्रमाणेच कमाल केली..! 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ह्याची खऱ्या अर्थानं प्रचिती आली..! आमच्या मालिकेच्या पूर्ण टीमला खूप प्रेम..! चंदू सर लवकरात लवकर बरे व्हा.खूप काम करायचंय. बाकी तुमच्या आशीर्वादानं आणि आपल्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नाने आपला टी.आर.पी. वाढतच आहे, तो असाच वाढत राहो आणि लवकरात लवकर पुन्हा तुम्हाला सेटवर त्याच एनर्जीत बघायला मिळो, ही नटराजचरणी प्रार्थना..! तुम्ही ग्रेट आहात हे सांगायची गरजच नाही. लव्ह यू सर.!, असे मयूर पवारने म्हटले आहे. 

मयूर पवारच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर भक्ती रत्नपारखी, अमेय बर्वे, हर्षद अतकरी, अश्विनी कासार असे अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. या सर्व कलाकारांनी चंद्रकांत कणसे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.