पाप...शाप... आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले'

लेखक राजेंद्र घाग यांच्या नजरेतून जाणून घेऊया ‘रात्रीस खेळ चाले 3’ बद्दल

Updated: Mar 23, 2021, 01:40 PM IST
पाप...शाप... आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले' title=

मुंबई : ‘अण्णा नाईक’ परत येणार, ह्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे, प्रत्येकजण २२ मार्च ची वाट पाहत आहेत. रात्रीस खेळ चाले २ मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वाना आहे. या निमित्त मालिकेचे लेखक राजेंद्र घाग यांच्या नजरेतून जाणून घेऊया ‘रात्रीस खेळ चाले’ बद्दल.

प्रत्येक घराण्याला एक इतिहास असतो. कोणी तो शोधतो तर कोणी शोधत नाही...पण इतिहास हा असतोच... त्या त्या घराण्याचा मूळ पुरुष कोणीतरी असतो आणि त्याची वंशवेल पुढे नांदताना दिसते ज्याला आपण पीढी म्हणतो... अशा अनेक पिढ्या त्या घराण्याच्या झालेल्या असतात...अशा एखाद्या पीढीत एखादा वंशज क्रूरकर्मा निपजतो. तो दुराचारी होऊन अराजक माजवतो. पूर्वजांनी नेमून दिलेले कुळाचार तो पायदळी तुडवतो.

स्वार्थासाठी तो पुण्याची कास सोडून पाप प्रवृत्त होतो. त्यामुळे त्याच्या हातून खून,व्यभिचार, व्यसन असली पापं घडत जातात. पण त्याचे भोग त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात.  कारण ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो त्यांचे असंतुष्ट आत्मे त्या पापी माणसा बरोबर त्याच्या घराण्याला शाप देत असतात. म्हणजेच पापं आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका पिढीने केलेलं पाप दुसऱ्या पिढीला शाप म्हणून भोगावं लागतं. परंतु पूर्वजांच्या, पूर्व पुण्याईने घराण्यातल्या सत्शील माणसा करवी त्या शापित घराण्याला उषा:पही मिळत असतो. पण त्या उ:शापासाठी घराण्यातल्या सच्छील व्यक्तीला खूप यातना सोसाव्या लागतात.त्याग करावे लागतात आणि त्यानंतरच ते घराणं शाप मुक्त होतं... म्हणजेच त्या घराण्याचा पाप...शाप... आणि उ:शाप असा एक प्रवास सुरू होतो.

अशाच एका नाईक घराण्याची "रात्रीस खेळ चाले" ही कथा. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले...अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली...अत्रुप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला...एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं...पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको.. ईंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते.

आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते...त्याची ही एक रंजक कथा. नाईक घराण्याचं पाप...शाप... आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच रात्रीस खेळ चाले भाग-१,२आणि ३असं म्हणता येईल. तेव्हा पाहायला विसरू नका रात्रीस खेळ चाले ३, २२ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वा. फक्त आपलया झी मराठीवर.