बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...'

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. 

Updated: Feb 21, 2024, 09:07 PM IST
बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...' title=

Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच गाजला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. 

जवळपास 8 कोटींचा गल्ला

एकदा येऊन तर बघा या मालिकेत विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. हा चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जवळपास 8 कोटींचा गल्ला जमवला होता. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला जाणार आहे. 

राजेश मोहंती करणार हिंदी रिमेकची निर्मिती

'एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती राजेश मोहंती करणार आहेत. त्यांनी नुकतंच याबद्दलची घोषणा केली आहे. यावेळी राजेश मोहंती म्हणाले, "आम्ही लवकरच या विलक्षण चित्रपटाचा हिंदी रिमेक करणार आहोत. या चित्रपटाची संकल्पना फारच उत्कृष्ट आहे. ही कथा भारतीय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची आम्हाला खात्री आहे." 

लवकरच स्टार कास्टबद्दल होणार खुलासा

"या चित्रपटासाठी आम्ही बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांना संपर्क साधला आहे. पण अद्याप त्यांनी आम्हाला होकार कळवलेला नाही. त्यामुळे यात कोणकोणते कलाकार झळकणार याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही लवकरच या चित्रपटातील स्टार कास्टबद्दल खुलासा करु", असे राजेश मोहंतीने म्हटले. 

दरम्यान ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट कौटुंबिक चित्रपट होता. यात गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करतात. या नव्या हॉटेलमध्ये विविध अतरंगी पाहुण्याची एन्ट्री होते आणि त्यानंतर मग गोष्टी कशा बदलतात अशी कथा यात दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.