The Kerala Story चा वाद पेटणार, 'या' राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली

The Kerala Story चित्रपटावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही. आता पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे, त्यावरुनही वाद सुरु झाला आहे. 

राजीव कासले | Updated: May 8, 2023, 08:13 PM IST
The Kerala Story चा वाद पेटणार, 'या' राज्याने थेट चित्रपटावरच बंदी घातली title=

The Kerala Story : बहुचर्चित द केरळ स्टोरी हा चित्रपट अखेर पाच मे रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटावरुन बराच वाद निर्माण झाला होता आणि आता प्रदर्शनानंतरही हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) अनेक राजकारण्यांनी यावर भाष्य केलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून 'लव्ह जिहाद'चं (Love Jihad) वास्तव्य दाखवलं जात असल्याचं बोललं जातं होतं. पण स्वत: दिग्दर्शकाने ही काल्पनिक कथा असल्याचं कोर्टात म्हटलं आहे. 

या राज्यात चित्रपटावर बंदी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bangal CM Mamta Bannerjee) यांनी 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटावर राज्यात बंदी (Ban) घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट हटवला जावा असे आदेश ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या मुख्य संचालकांना दिले आहेत. राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. (West bengal government bans the Kerala story movie)

भाजपावर आरोप
ममता बॅनर्जी यांनी भाजपावर गंभीर आरोपही केला आहे. भाजप सरकार काल्पनिक आणि चुकीच्या आधारावर बंगाल फाइल्स बनवण्यासाठी निर्मात्यांना पैसे देत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. द केरळ स्टोरी चित्रपटही अशाच काल्पनिक गोष्टीवर आधारीत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप सरकारने काही कलाकार बंगालमध्ये पाठवले होते, हे कलाकार या काल्पनिक बंगाल फाइल्स चित्रपटाची तयारी करत होते, असा आरोपही ममता बॅनर्जींनी केला आहे. 

द केरळ चित्रपटाच्या माध्यमातून भाजप केरळ राज्य आणि तिथल्या लोकांचा अपमान करत आहेत. भाजपकडून जाती-धर्माच्या आधारावर सामुदायिक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान तामिळनाडूमध्येही चित्रपटगृहात द केरळ स्टोरी चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दिग्ददर्शकाची प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयानंतर 'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक विपुल शाह यांनी उत्तर दिलं आहे. विपुल शाह आणि चित्रपटाचे डिरेक्टर सुदीप्तो सेन यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये चित्रपट न दाखवण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने आमची बाजू ऐकावी. आणि असं न केल्यास आम्ही कायदेशीर पाऊल उचलू असं विपुल शाह यांनी म्हटलं आहे. 

तामिळनाडूत बॉयकॉट ट्रेंड
पश्चिम बंगालआधी तामिळनाडुत 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉयकॉट करण्यात आला आहे. तामिळनाडुतल्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपटगृहात हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.  तामिळनाडुतल्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने रविवारीच संपूर्ण राज्यात या चित्रपटाची स्क्रिनिंग बंद पाडली होती. हा चित्रपट राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवू शकतो, असं कारण त्यांनी सांगितलं आहे. शिवाय या चित्रपटाला लोकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचंही तामिळनाडुतल्या मल्टिप्लेक्स असोसिएशनचं म्हणणं आहे. 

'द केरळ स्टोरी' वाद काय?
दे केरळ स्टोरी या चित्रपटात केरळातील 32 हजार मुली लव्ह जिहादच्या शिकार झाल्याचा दाव या चित्रपटातून करण्यात आला आहे. या दाव्यावरुन वाद सुरु झाला. केरळ उच्च न्यायालयात या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी याचिका करण्यात आली. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. या प्रकरणाच्या सुनावणीत चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावरुन 32 महिलांचं वाक्य हटवण्याचं मान्य केलं. पण यानंतरही या चित्रपटावून वाद कायम आहे.