'छत्रपती संभाजी' चित्रपटात दलिप ताहिल साकारणार 'मुकर्रब खान'

अभिनेता दलिप ताहिल हे नाव  घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. -m

Updated: Jan 16, 2024, 04:59 PM IST
'छत्रपती संभाजी' चित्रपटात दलिप ताहिल साकारणार 'मुकर्रब खान'  title=

मुंबई : अभिनेता दलिप ताहिल हे नाव  घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'छत्रपती संभाजी' या  चित्रपटात ते मुघल सरदार 'मुकर्रब खान' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. 

छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेल अशी प्रतिज्ञा करणारा मुघल सरदार मुकर्रब खान हा औरंगजेबाचा नातेवाईक. शेख निजाम अर्थात मुकर्रब खानाने संभाजी राजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला. 'छत्रपती संभाजी' चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ऐतिहासिक भूमिका मला करायला मिळाली. या चित्रपटातील क्रूर मुकर्रब खानची भूमिका करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग व वेगळा अनुभव असल्याचं दलिपजी सांगतात.  

राकेश सुबेसिंह  दुलगज यांनी 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. 'परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट' आणि 'एजे मीडिया कॉर्प' प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये २६ जानेवारीला एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.   

या चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार आहेत.    

'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला  प्रेरणादायी इतिहास  'छत्रपती  संभाजी' या चित्रपटातून  तरुण पिढीला पाहता येणार आहे.