"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेले संवादच नाही तर इतर संवादही फारच वेगळ्या भाषेत लिहिल्याचा आक्षेप चाहत्यांनी घेतल्यानंतर संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आपली बाजू मांडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2023, 09:43 AM IST
"मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान title=
चित्रपटामधील संवादावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे

Adipurush Dialogues Manoj Muntashir Says Ready To Apologize: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या चित्रपटामधील संवादांपासून ते चित्रपटामधील दृष्यांपर्यंत अनेक गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला आहे. व्हीएफएक्सवरुन सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अधिक प्रमाणात आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यातही हनुमानाच्या (Hanuman) तोंडी देण्यात आलेला एक डायलॉग तर अगदी 'छपरी' असल्याचा शेरा चाहत्यांनी दिला आहे. हनुमानाच्या तोंडी दाखवण्यात आलेला, ‘कपड़ा तेरे बाप का, तेल तेरे बाप का..तो जलेगी भी तेरे बाप की' या डायलॉगवर टीका होत असतानाच संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी एका अटीवर माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे.

अनेक डायलॉग वादात

आदिपुरुष (Adipurush) चित्रपटामधील केवळ हनुमानाच्या तोंडी असलेला संवाद नाही तर इतरही अनेक संवाद वादात अडकले आहेत. एका दृष्यामध्ये हनुमान अशोक वाटिकेमध्ये फिरत असताना एक राक्षस त्याला, "यह तेरी बुआ का बगीचा है जो हवा खाने चला आया" असं म्हणत. तसेच जेव्हा रावण अंगदला आव्हान देतो तेव्हा अंगद, "रघुपति राघव राजा राम बोल और अपनी जान बचा ले, वरना आज खडा है कल लेटा हुआ मिलेगा" असं म्हणतो. चित्रपटातील असे अनेक संवाद चाहत्यांना खटकले असून यावर मनोत मुंतशिर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जे दर्शक आपल्या मुलांना भगवान श्री रामाची मर्यादा आणि संस्कार याबद्दलचे आदर्श घ्यावा या हेतूने चित्रपटगृहांमध्ये घेऊन जाण्यास तयार आहेत ते अशा संवादांमुळे चित्रपटगृहांपर्यंत जातील का? असा प्रश्न मुंतशिर म्हणाले आहेत. "आम्हाला लक्ष्य केलं जात आहे. आमची कमतरता ही आहे की शुद्धतेच्या स्तरावर आम्ही चित्रपट विकला नाही. आम्ही कधीच असं म्हटलं नाही की वाल्मीकिंनी जी भाषा वापरली त्या भाषेचाच चित्रपटात वापर करण्यात आला आहे असं आम्ही कधीच म्हटल नाही. जर शुद्ध भाषेच्या आधारावर विचार करायचा झाल्यास तर मी माझी चूक मानतो. शुद्ध लिहायचं असतं तर संस्कृतमध्ये लिहावं लागलं असतं. मात्र मग मी हे लिहिलं नसतं कारण मला संस्कृत येत नाही," असं मुंतशिर म्हणाले.

आम्ही अशा देशात ही कथा सांगतोय जिथे...

"मात्र शुद्ध भाषा हा आमचा हेतू कधीच नव्हता. आमचा हेतू हा होता की अशा मुलांपर्यंत आम्ही पोहोचलं पाहिजे ज्यांना भगवान श्रीराम कोण आहेत हे ठाऊक नाही. मला हे पाहून फार वाईट वाटतं की 10-12 वर्षांची मुलांना भगवान श्रीरामाबद्दल तेवढीच माहिती आहे जेवढी त्यांच्या आई-बाबांनी त्यांना सांगितली आहे. घरात रामाचा पाहिलेला फोटो आणि पालकांनी दिलेली माहिती एवढीच त्यांना रामाची ओळख आहे. ज्या देशात शाहजहां आणि बाबारच्या सात पिढ्यांबद्दलची माहिती आहे आणि राम, दशरथ यांच्याशीवाय त्यांच्या इतर पिढ्यांबद्दल माहिती नाही तिथे आम्ही रामाची ही कथा सांगतोय," असं मुंतशिर यांनी म्हटलं. 

हात जोडून माफी मागतो पण...

"मी सर्व काही साध्य करु शकत नाही हे मी सांगू इच्छितो. तुम्ही रुसलात आणि नाचत ही आहात हे कसं चालणार असं कबीरने एका जागी म्हटलं आहे. तेव्हा चित्रपट तरुणांपर्यंत पोहोचावा असा विचार आम्ही केला असेल तेव्हा वयस्कर लोकांनी ज्या पद्धतीने रामायण पाहिलं, वाचलं, समजलं आहे त्यापासून आम्ही थोडे दूर गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. मी अशा लोकांची हात जोडून माफी मागतो. मात्र आम्ही जाणूनबुजून केलेलं नाही," असं मुंतशिर म्हणाले.

व्यक्त केली खंत...

एकाच डायलॉगवरुन वाद निर्माण झाला असून इतर चांगल्या संवादांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोपही मुंतशिर यांनी 'आजतक'शी बोलताना केला. "भगवान राम शबरीच्या चरणांमध्ये बसून, आपण जन्माने नाही कर्माने लहान किंवा मोठे असतो असं म्हणतो. याकडे कोणी लक्ष देत नाही. रामाने मला मिळवण्यासाठी धनुष्य तोडलं होतं आता त्याला रावणाचा अहंकार तोडावा लागेल असं सिता माता म्हणते याकडे कोणी लक्ष देत नाही," अशी खंत मुंतशिर यांनी व्यक्त केली.