आराध्यासाठी अभिषेकनं उचललं 'हे' पाऊल

अभिषेकचा हा निर्णय खरंच फायद्याचा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Updated: Sep 22, 2018, 06:13 PM IST
आराध्यासाठी अभिषेकनं उचललं 'हे' पाऊल title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'मनमर्जियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील अभिषेकच्या भूमिकेने अनेकांची मनंही जिंकली. पण, आता मात्र त्याने येत्या काळात आपल्या चित्रपटाच्या आणि त्यात असणाऱ्या भूमिकांच्या निवडीबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुलीच्या म्हणजेच आराध्याच्या दृष्टीने विचार करत त्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे कोणत्याही चित्रपटाची निवड ही आराध्याचा विचार करुनच करणार असल्याच्या निर्णयावर तो पोहोचला आहे. 

सध्यातरी माझं स्वत:चं मत विचारात घ्यायचं झालं तर, आराध्याला संकोचलेपणा वाटेल, अशा चित्रपटात काम करणं मला आवडणार नाही', असं अभिषेक म्हणाला. जागरन सिनेमा समिटमध्ये बोलतेवेळी त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. 

ऐश्वर्या आणि आपण कधीही आराध्याने आमच्याप्रमाणेच अभिनय क्षेत्राची करिअर म्हणून निवड करावी अशी अपेक्षा केली नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. 

अतिशय महत्त्वाच्या निर्णयाविषयी सांगितल्यानंतर त्याने यावेळी स्वत:च्या बालपणीचंही उदाहरण दिलं. आपल्या वडिलवांनी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी कधीही कामाचे विषय हे घरापर्यंत आणले नसल्याचं सांगत आपणही सर्वसामान्यांप्रमाणेच मोठे झालो असल्याचं तो म्हणाला. 

तेव्हा आता मुलीच्या हिताच्या दृष्टीने विचार करणाऱ्या अभिषेकचा हा निर्णय खरंच फायद्याचा ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.