'आज संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय'

पद्मजा फेणाणीयांच्या लतादीदींसोबतची आठवणी...  

Updated: Feb 6, 2022, 01:56 PM IST
'आज  संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय' title=

पद्मजा फेणाणी जोगळेकर : आज  संगीत क्षेत्रातील सुवर्णपान गळून पडलंय. संगीताचा आमचा आधार हरपलाय. काही वर्षांपूर्वी लिहिलेला भारतरत्न लता दीदींच्या आठवणींना उजाळा देणारा लेख, पुन्हा आपल्याबरोबर शेअर करत आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! 

कहीं ये 'वो'तो नहीं....

साल १९८२....  भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला..... "मी मुंबई दूरदर्शनसाठी, एक दिवाळी पहाट स्पेशल... 'शब्दांच्या पलिकडले' करतोय. मी आणि दीदी गातोय. त्यात तुम्हीही गावं अशी आमची इच्छा आहे...." हे फोनवर ऐकताक्षणी, माझ्या पायात कापरं भरलं आणि आनंदानं हात थरथरू लागले. हे सारं काही 'विश्वासाच्या पलिकडलं' होतं. आजही माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना परमेश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देतात.

दीदींनी आणि बाळासाहेबांनी मला 'तरुण आहे रात्र अजुनी' गायला बोलावलं खरं, मात्र रेकॉर्डिंगच्या आदल्या रात्री मी बाळासाहेबांकडून गाणं घेऊन घरी परतल्यावर मला, "तुमचं उद्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल झालंय" असं सांगणारे निनावी फोन वारंवार येऊ लागले. इतकी मोठी सुवर्णसंधी हातून जाईल की काय, असं वाटून मी खट्टू झाले. 
बाळासाहेबांना फोन केल्यावर ते म्हणाले, "दीदीशी बोलून घे." त्वरित मी दीदींना फोन केला, आणि सारं सांगितलं.... त्यावर त्या गोssड  आवाजात म्हणाल्या, " ही तर तुमच्या यशाची पहिली पायरीच समजा. माझ्याही बाबतीत करियरच्या सुरुवातीला असंच घडायचं!".....

दीदींचा 'हा असा'आश्वासक सूर माझ्या सांगीतिक कारकीर्दीच्या सुरुवातीलाच माझ्या पाठीशी 'मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश' सारखा उभा राहिला, हे मी माझं भाग्यच समजते. 

पूज्य माई मंगेशकरांचा माझ्यावर असलेला लोभ आणि त्यांचे मला लाभलेले आशीर्वाद हे ही माझं सद् भाग्यच!

सन १९८१ मधे अनील-अरुण या संगीतकार द्वयींच्या 'शब्दांच्या पलिकडले' मधे मी गायलेले 'धुंद मंद ही अशीच सांज उतरली' हे माझं दूरदर्शनवरचं अगदी पहिलं वहिलं गीत ऐकून, "ही मुलगी कोण? हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला आणि मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय...." ही दीदींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया  अनिल मोहिलेंकडून मला समजल्यावर, माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.

'लता मंगेशकर' हे नावच इतकं जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझं 'धुंद मंद...' गाणं ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल.पी.रेकॉर्डस् ही मी जपून ठेवल्यायत. 

'निवडुंग' चित्रपटासाठी 'केंव्हा तरी पहाटे' व 'लवलव करी पातं' ही गाणी बाळासाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी, "मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय,"... हा शब्दही पुरा केला. 

दीदींना दादरच्या पुरोहितांचे, पांढरे बारीक साखर पेरलेले पेढे, खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्यासाठी घेऊन जाई. त्यावेळी आपल्या रूम मधे टी.व्ही.वर मिकी माऊसची कार्टून्स पहाताना, खळखळून हसणाऱ्या दिदींना पाहून मला आश्चर्य वाटे नि त्यांनी स्वत:त जपलेले मूल पाहून आनंदही होई. त्यावेळी अनेकदा दीदी आधी मला पेढा भरवत, मगच स्वतः खात. त्या छोट्या पेढ्यातला तो केवढा मोठ्ठा आनंद!

असंच कधीतरी गप्पा मारताना, दीदी त्यांच्या परिचयातील  जुन्या गायकांच्या गायकीची हुबेहूब नक्कल करून दाखवित. त्यावेळी २५-३० वर्षांपूर्वीचे सारे काही दीदींना जसेच्या तसे कसे काय आठवते, याचे मला कुतूहल वाटे..... तर मग कधी त्या माझ्याच समक्ष, दोन्ही हातांनी हातवारे करून, मी जशी गाते, तशीच थेट नक्कल करून दाखवत हास्याचे फवारे उडवित. 

एकदा दीदींनी मला, "मी भरली वांगी कशी करते ते पहायला या" म्हणून स्वत:च्या सपाता मला घालायला देऊन स्वयंपाकघरात नेले. मला कोण आनंद!  जणू काही त्यांच्या सुरांनी त्यांच्या सपातांतून माझ्या शरीरात वीजेप्रमाणे प्रवास केला तर.... काय मज्जा येईल? असेच मला वाटत होते. 

कढई, तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छेद असलेली छोटी वांगी, सारे काही आधीच तयार होते. जणू काही संगीत दिग्दर्शकाने वाद्यवृंदासह गाण्याची जय्यत तयारी केल्यासारखे! मग दीदींनी सर्व मसाले प्रमाणात घेऊन, एका ताटात कालवले आणि छेद असलेल्या वांग्यांत भरून, ती वांगी अलगदपणे उकळत्या तेलात सोडली. ही सर्व प्रक्रिया मला दीदींच्या गाण्याप्रमाणेच भासली..... संगीतकाराने तयार ठेवलेल्या प्रत्येक गाण्यात, भावभावनांचे  रंग योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात मिसळून, दीदी किती तरलपणे रसिकांसमोर सादर करतात तशीच! गंमतच सारी न्यारी!  सारे काही खमंग, चविष्ट आणि सुरेल! 

बालपणापासून दीदींनीच सर्वात प्रथम अनेक पिढ्यांना चांगलं 'दर्जेदार संगीत' काय असतं हे शिकवलं. त्यांनी चांगलं वाईट जाणण्याची नीर क्षीर विवेकबुद्धी दिली. हिंदुस्थानी संगीतातला लखलखता जरतारी, उत्तुंग स्वर म्हणजे मास्टर दीनानाथ! या ओजस्वी आणि तेजस्वी दिनानाथांचीच कन्या ती! ते तेज आणि ओज दीदींमध्ये उतरलं नाही तरच नवल! 

आचार्य अत्रेंनी म्हटल्याप्रमाणे 'लोण्यात केशर विरघळावे' तसा दीदींचा आवाज! दीदींनीच हिंदी व उर्दूचे उच्चार शिकवले आम्हां रसिकांना. दीदींच्या स्वरांनी धर्म, भाषा, जात, पात, देश, खंड, उपखंड न मानता एकछत्री अंमलाखाली अनेक वर्षं अधिराज्य गाजवलं.

रसिकांचे हे असे त्यांच्या प्रति प्रेम अव्याहत सुरूच राहणार आहे. कधी दूरदूरच्या दौऱ्यात, प्रवासात एकटे असताना, दीदींचे गाणे कानावर पडले तर केवढा मोठ्ठा आधार वाटतो आणि एकटेपण पळून जातं. कुठे कसं गावं, कुठे कसा शब्दोच्चार करावा, तलमपणे व तरलपणे भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे ठहराव घ्यावा, कुठे श्वास घ्यावा, कुठे हरकती, मुरक्या घ्याव्यात नि कुठे घेऊ नये, तसेच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला साजेशा आवाजात गायलेलं गाणं......एक ना दोन... अशा अमाप गोष्टींच्या अचूकतेचा 'वस्तूपाठ' म्हणजे साक्षात् दीदी! सरस्वतीचाच वरदहस्त तो! एखाद्या विद्यापीठातही शिकायला मिळणार नाही असा कंठ, हृदय आणि बुद्धीचा संगम! 

झपाटून टाकणाऱ्या त्यांच्या स्वरांचा रोज अभ्यास केला तरी कमीच! प्रतिभावंत संगीतकार (आनंदघन) म्हणूनही दीदी ग्रेटच! सहजसुंदर आणि शब्दांना चित्ररूप व समर्पक न्याय देणाऱ्या रचना, हे त्यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ट्य! उदा. ऐरणीच्या देवा तुला..., अखेरचा हा तुला दंडवत...!

अशा या दीदी एकदा भल्या पहाटे माझ्या स्वप्नात आल्या. मी नि त्या, त्यांच्या देवघरात बसलो होतो. श्री. मंगेशाचे, मास्टर दीनानाथांचे, सर्व दैवतांचे फोटो मला स्वप्नातही स्वच्छ दिसत होते. तानपुरा चालू होता. दीदी ज्ञानेश्वरी गात होत्या. त्यांचा सोनेरी, रेशमी, आणि नितळ स्वच्छ आवाज माझं अंगांग पुलकित करीत होता. रोमरोमांत दीदींचा झंकारणारा दैवी आवाज एखाद्या धूप अगरबत्तीसारखा देवालयात दरवळत होता नि ते ऐकून मला स्वप्नातच चक्क इंग्रजीत कविता सुचली..... ती अशी.....

Divine Soul..... 
The Divine soul, in my dream I heard, 
The divine voice, out of this world, 
The divine soul is still lingering in my mind, 
I have never heard the 'haunting' this kind;
Both of us were worshipping God in my dream, 
My Goddess, whom I worship, is the cream of supreme;
Our soul 'Lata' is the 'Empress' of Nightingales, 
There are no boundaries to measure her qualities with scales;
While listening to her music, my eyes were dripping, 
I was showered with Rose Petals, 
The experience was thrilling,
I requested her to bless me with her soul, 
I am sure, one day, I will achieve my 'goal'...... 

स्वप्नातून जागे झाल्यावर अत्यंत आनंदात ही कविता मी लिहून ठेवली. स्वप्न संपूच नये असे वाटत होते. त्या भारावलेल्या अवस्थेतच मी स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होते. स्वप्नातल्या 'त्या' आनंद तरंगाची 'अनुभूती' वास्तवात यावी हे जणू विधिलिखित असावे! 'स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले'.... हेच खरं!

लवकरच ... अगदी थोड्याच दिवसात म्हणजे २६ जानेवारी २००१ रोजी भारत सरकार कडून सर्वोच्च नागरी पुरस्काराने दीदींना 'भारतरत्न' व मला 'पद्मश्री'ने सन्मानित केल्याचे एकाच वेळी जाहीर झाले, अन्  दीदींचे मला अभिनंदनपर सुंदर पत्र आले. मी भाग्यवान अशी, की दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातील सोहोळ्यातही मला दीदींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न स्वीकारताना पहायला मिळाले. 

माझं नाव पुकारल्यावर पुढे येऊन मी गानसरस्वतीला वाकून नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत "wish you all the best" असा छान आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मी राष्ट्रपतींच्या हस्ते 'पद्मश्री'चा स्वीकार केला. मला काही दिवसांपूर्वी अनाकलनीय वाटणाऱ्या 'त्या' स्वप्नाचा अर्थ.....(one day, I will achieve my 'goal'...) राष्ट्रपती भवनात  माझ्या आयुष्यातल्या सर्वोच्च सन्मानाचा क्षण अनुभवताना उलगडत होता. हे सारे क्षण माझ्यासाठी केवळ अनमोल आहेत. 

१९८४ साली मी माझ्या स्वतंत्र कार्यक्रमांसाठी माझ्या पहिल्यावहिल्या परदेश दौऱ्यावर अमेरिकेत असताना योगायोगाने दीदींचाही दौरा अमेरिकेतच सुरू होता. त्यावेळी त्यांना न्यूयॉर्क एअरपोर्टवर पत्रकारांनी घेरले नि विचारले, "Is there any other voice ranking along side you?" त्यावेळी दीदी उतरल्या,"Yes, I see a spark, a young girl Padmaja Phenany. She is extremely talented with an outstanding voice and she is my hope..."
अर्थातच हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव होता. ... अगदी 'पद्मश्री' सारखाच! 

असेच एकदा अमेरिकेच्याच एका दौऱ्यात दीदींच्या लॉस एंजेलिसमधल्या एक कार्यक्रमास, मी त्यांना ऐकायला गेले होते. गंमत म्हणून चॉकलेट्स घेऊन गेले. ती भेट हातात देताना दीदींच्या थंडगार हाताचा स्पर्श जाणवला... अगदी बर्फासारखा! वाटले, या संगीताच्या शिखरावर असताना दीदींना का बरे टेन्शन यावे? पण मग लगेच जाणवले.... त्यांना त्यांच्या 'लता मंगेशकर' असण्याचे टेन्शन असावे कदाचित! दशकानुदशके तोच उत्तुंग दर्जा सातत्याने अबाधित राखणे याचे हे फार दुर्मिळ उदाहरण!

त्यावेळी दीदींच्या प्रत्येक दौऱ्यात, माझे गुरुजी, 'पद्मश्री' पंडित हृदयनाथजी त्यांच्याबरोबर असायचे, तेही कंट्रोलरूममधे! अशी घरच्या विद्वान मंडळींची साथ असणे हे कलाकाराला मानसिक दृष्ट्याही फार महत्वाचे असते. दीदींच्या आयुष्यात बाळासाहेबांचे अस्तित्व हे असेच अनन्यसाधारण आहे. 

माझे गुरू आदरणीय बाळासाहेबांच्या प्रोत्साहनामुळे, वादकांच्या आग्रहामुळे, मी दीदींच्या पंच्याहत्तरीला दीदींना मानवंदना म्हणून 'तेरे सूर और मेरे गीत' या कार्यक्रमास सुरुवात केली. दीदींनी इतक्या अप्रतिम गायलेल्या या गाण्यांना त्यांच्या व्यतिरिक्त कुणी स्पर्शू बाई असे वाटायचे, म्हणून जवळपास २ वर्षं मी या कार्यक्रमास नकार देत होते. परंतु "साक्षात दीदींनी तुझं कौतुक केलंय, त्यामुळे तू त्यांना तुझ्या गाण्यातून जरूर मानवंदना दे." या वादकांच्या प्रेमळ आग्रहामुळे शेवटी मीही सर्व गाणी, मूळ सौंदर्यगाभा न बदलता, माझ्या शैलीत गायचे ठरवले.  

माझ्या बालपणी दीदींच्या ज्या गाण्यांचे संस्कार झाले ती, तसेच सहसा वाद्यवृंदात गायली जात नाहीत, अशी गाणी मी निवडली. उदा. 'जाने कैसे सपनों में,ना जिया लागे ना, अजी रूठकर, .....त्यातले 'कहीं ये वो तो नहीं' हे गाणे तर बाळासाहेबांचे खूप आवडते, म्हणून ते माझ्याकडून नेहमी म्हणून घेत आणि सांगत, यातला 'वो' म्हणजे साक्षात् परमेश्वरच मला दिसतो.  

कार्यक्रमास सुरुवात करताना, दीदींचा आशीर्वाद घेतेवेळी, 'तेरे सूर और मेरे गीत'  हेच नाव का ठेवले? अशी दीदींनी पृच्छा केली. त्यावेळी मी त्यांचा छोट्टासा गुलाबी, मऊशार हात हाती घेऊन म्हटलं, "तुमच्याच गीतात व्यक्त झाल्याप्रमाणे..... "धड़कन में तू है समाया हुवा, ख़यालों में तू ही तू छाया हुवा, दुनिया के मेले में लाखों मिले, मगर तू ही तू दिल को भाया हुवा....." ही भावना तुम्हांप्रती माझ्या मनात आहे  मधाळ सुरांनी काळीज कापणाऱ्या, गाण्याचं हेच मोहित करणारं रहस्य आहे. "

दीदींच्या सुरात, 'प्रभू तेरो नाम' ऐकताना कानात देव, मनात देव, रोमरोमांत देव आणि डोळ्यांतून फक्त अश्रूधारा अशी माझी अवस्था असते. या दैवी सुरांत परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच वाटतं,........."  'कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?'........

गायिका आणि संगीतकार पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी लिहिलेला खास ब्लॉग