आजपासून असे असतील मोबाईल रिचार्ज दर

मोबाईल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार.  

Updated: Dec 3, 2019, 07:33 AM IST
आजपासून असे असतील मोबाईल रिचार्ज दर  title=

मुंबई : दूरसंचार कंपन्यांकडून आता ५० टक्के शुल्कवाढ केली जाणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपनीची आज तर जिओ ६ डिसेंबरपासून दरवाढ करणार आहे. व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलनं ३ डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्कात जवळपास ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओनंही ६ डिसेंबरपासून जवळपास ४० टक्के दरवाढीची घोषणा केलीय.

या दरवाढीमुळे संभाषण आणि मोबाइल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार आहे. तसंच मोबाइल जोडणी महिनाभर कायम राहावी यासाठी ग्राहकांना किमान ४९ रुपयांचा रिचार्ज करणं आवश्यक आहे.

मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवा पूर्वीपेक्षा ४० टक्क्यांनी महागणार आहे. या निर्णयामुळे जिओचा फायदा ३०० टक्क्यांनी वाढणार आहे. ६ डिसेंबरपासून सुरु जिओकडून ऑल इन वन प्लॅनची अंमलबजावणी होईल. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड मोबाईल कॉल आणि डेटा सुविधा मिळेल. 

तर दुसरीकडे वोडाफोन-आयडियाने आपल्या नवीन प्रीपेड प्लानचे दर वाढवले आहेत. या नव्या प्लान अंतर्गत व्हाईस कॉल आणि डेटाचे दर महागणार आहेत. येत्या ३ डिसेंबरपासून ग्राहकांना नवीन दरानुसार पैसे मोजावे लागतील.

यापैकी २९९ आणि ३९९ रुपयांचे पॅक ३ डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तर ३९९ रुपयांच्या पॅकमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता असेल. 

३७९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, ६ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळेल. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा दररोजसह १०० एसएमएस मिळणार आहे. तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डेटा दररोज आमि १०० एसएमएस मिळणार आहे.