६ वर्षात एकच टेस्ट गमावलेल्या पुण्यात टीम इंडियाचा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.

Updated: Oct 9, 2019, 05:00 PM IST
६ वर्षात एकच टेस्ट गमावलेल्या पुण्यात टीम इंडियाचा सामना title=

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवून ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये विजय मिळवला तर टीम इंडिया ही सीरिज खिशात टाकेल. पण मागच्या ६ वर्षात भारताला पुण्याच्या मैदानातच पराभवाचा सामना करावा लागला. या कालावधीत भारताने २३ टेस्ट मॅच जिंकल्या.

२०१७ साली पुण्याच्या या मैदानात भारताला ३३३ रननी हरवलं होतं. तेव्हा भारतीय टीमला दोन्ही इनिंगमध्ये ११० रनचा टप्पाही गाठता आला नव्हता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा भारतात शेवटचा विजय २०१० साली झाला होता. नागपूर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने एक इनिंग आणि ६ रननी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने त्यांची इनिंग ५५८/६वर घोषित केली होती. यानंतर भारताचा २३३ आणि ३१९ रनवर ऑलआऊट झाला होता.

विशाखापट्टणमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला होता. या मॅचमध्ये रोहित शर्माने दोन्ही इनिंगमध्ये शतक झळकावलं. तर मयंक अग्रवालने पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक केलं. चेतेश्वर पुजाराने ८१ रनची खेळी केली, तर अश्विनने मॅचमध्ये एकूण ८ विकेट घेतल्या. जडेजाला मॅचमध्ये ६ आणि शमीला ५ विकेट मिळाल्या.