IND vs PAK : फक्त 12 धावा दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास

India vs Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची. 9 जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंतरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 8, 2024, 06:54 PM IST
IND vs PAK : फक्त 12 धावा दूर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास title=

Virat Kohli Ind vs Pak : अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. अमेरिकेने बलाढ्य पाकिस्तानचा (USA Defeat Pakistan) पराभव केला. तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला धुळ चारली. बांगलादेशने श्रीलंकेला चारी मुंड्या चीत केलं. या धक्कादायक निकालांमुळे टी20 वर्ल्ड कपची उत्सुकता वाढू लागली आहे. सुपर एटमध्ये कोणते संघ धडक मारणार याबाबत क्रिकेट तज्ज्ञही संभ्रमात आहेत. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची.

टीम इंडियाची विजयी सलामी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) टी20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 8 विकेटने पराभव केला. या सामन्यात ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने दमदार फलंदाजी केली तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मोठी धावसंख्या करता आली नाही. या सामन्यात विराटने रोहित शर्माबरोबर भारतीय डावाची सुरुवात केली होती. आता 9 जूनला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. कारण इतिहास रचण्यापासून विराट कोहली अवघ्या 12 धावा दूर आहे. 

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा
विराट कोहलीची पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी राहिली आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या टी20 आंतरराष्ट्रायी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली टॉपवर आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 81.33 अॅव्हरेजने 488 धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यापैकी 308 धावा विराटने टी20 वर्ल्ड कपमध्ये केल्या आहेत. 

या विक्रमापासून दूर
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 9 जूनला विराट कोहली फलंदाजीसाठी जेव्हा मैदानात उतरेल. त्यावेळी सर्वांच्याच नजरा त्याच्यावर असतील. या सामन्यात विराटने 12 धावा केल्यास भारत-पाकिस्तानदरम्यान टी20 सामन्यात 500 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाही फलंदाजाला 200 धावाही करता आलेल्या नाहीत.

भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तानी संघ 
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान