आयपीएल : मुंबई इंडियन्सनं कायम ठेवले हे तीन खेळाडू

आयपीएलच्या ११व्या सिझनआधी मुंबई इंडियन्सनं तीन खेळाडूंना कायम ठेवलं आहे.

Updated: Jan 4, 2018, 06:41 PM IST
आयपीएल : मुंबई इंडियन्सनं कायम ठेवले हे तीन खेळाडू  title=

मुंबई : आयपीएलच्या ११व्या सिझनआधी मुंबई इंडियन्सनं तीन खेळाडूंना कायम ठेवलं आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू आयपीएलचा पुढचा सिझन मुंबई इंडियन्सकडून खेळतील. आयपीएल टीमना जास्तीत जास्त तीन खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी होती. तर दोन खेळाडूंना लिलावावेळी राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा एकदा टीममध्ये घेता येणार आहे.

राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?

मुंबई इंडियन्सनं पोलार्डला टीममध्ये कायम ठेवलं नाही तर त्याला आयपीएलच्या लिलावाला सामोरं जावं लागेल. या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं पोलार्डला ८ कोटी रुपयांना विकत घेतलं तर मुंबई इंडियन्स राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा पोलार्डला टीममध्ये घेऊ शकतं.

चेन्नई-राजस्थानचं कमबॅक

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं कमबॅक होणार आहे. या दोन्ही टीमना दोनवर्षांपूर्वी त्यांच्या टीमकडून खेळलेले आणि नंतर पुणे किंवा गुजरातकडून खेळलेल्या खेळाडूंनाच कायम ठेवता येणार आहे. २७ आणि २८ जानेवारीला आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार आहे.