'रोहित कॅप्टन असताना मुंबई सलग 5 मॅच हरल्यानंतर...'; हार्दिकची बाजू घेत सेहवाग स्पष्टच बोलला

Mumbai Indians Captain Hardik Sacking Speculation: मुंबईने यंदाच्या पर्वातील आपले पहिली तिन्ही सामने गमावले असून यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु असून आता हार्दिकची बाजू घेत थेट रोहितच्या रेकॉर्डबद्दल एका दिग्गज क्रिकेटपटूने भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 5, 2024, 02:07 PM IST
'रोहित कॅप्टन असताना मुंबई सलग 5 मॅच हरल्यानंतर...'; हार्दिकची बाजू घेत सेहवाग स्पष्टच बोलला title=
सेहवागने जुन्या आकडेवारीचा केला उल्लेख

Mumbai Indians Captain Hardik Sacking Speculation: मुंबई इंडियन्सच्या संघाचं नेतृत्व हा यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमधील ज्वलंत विषय ठरत आहे. हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्याऐवजी नेतृत्व बहाल करण्यात आल्यानंतर क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने दिलेला नकार योग्य आहे की अयोग्य याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. बरं हा सारा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मैदानातही मुंबईसाठी फारसे अच्छे दिन पाहायला मिळत नसून संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत. 17 सामन्यानंतरही मुंबईचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये गुणांचा भोपळा फोडू न शकलेला एकमेव संघ असून तो तळाशी म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे. मुंबईचे चाहते त्यांच्याच कर्णधाराही म्हणजेच हार्दिकची जाईल त्या मैदानात हुर्यो उडवता दिसत आहे. मुंबईचं होम ग्राऊण्ड असलेल्या वानखेडे स्टेडियमवरही रविवारी हा प्रकार पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

हार्दिकची उचलबांगडी होईल अशी शक्यता

राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईच्या संघाने गमावल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिक पंड्याची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली जाऊ शकते असं मत 'क्रिक बझ'शी बोलताना व्यक्त केलं. याच चर्चासत्रात सहभागी झालेल्या विरेंद्र सेहवागने यावर नोंदवलेली प्रतिक्रिया सध्या क्रिकेटरसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

रोहितच्या नेतृत्वात सलग पाच सामन्यांमध्ये पराभव

 "मला वाटतं हे असं विधान करणं सध्या घाईचं ठरेल. मुंबईचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वामध्येही सलग पाच सामने पराभूत झाला होता. तेव्हा 5-0 अशी परिस्थिती होती. त्यानंतरही त्यांनी पुढच्या टप्प्यात आगेकूच केली होती. त्यामुळे ते (मुंबई इंडियन्सचं व्यवस्थापन) हार्दिकबरोबरची सध्याची परिस्थिती संयमाने हाताळतील. हे मी नाही आकडेवारी सांगत आहे. ते सध्या 0-3 वर आहेत. मात्र आता यानंतरही हे अंतर वाढत राहिलं तर ती संघ व्यवस्थापनाच्या संयमाची परीक्षा ठरेल," असं सेहवाग म्हणाला. 2022 च्या पर्वात पहिल्या 23 सामन्यानंतरही मुंबईच्या संघाची अवस्था 5 पैकी 5 सामन्यामध्ये पराभूत अशी होती. त्यावेळीही संघ तळाशी होता. याचीच आठवण सेहवागने करुन दिली आहे.

यापूर्वीही अनेक संघांनी असा मध्येच कर्णधार बदललाय

"दोन ते तीन संघांनी हे असं केलं आहे. पंजाबने असा कर्णधार बदलला आहे. चेन्नईनेही जडेजाच्याबाबतीत असं केलं आहे. जडेजाकडून अचानक पुन्हा कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आलं. मात्र हे सारं स्पर्धा सुरु असतानाच घडलं होतं. मला नाही वाटत की मुंबई सध्या कर्णधार बदण्याचा विचार करेल. केवळ 3 सामन्यानंतर तुम्ही कॅप्टन बदलू शकत नाही. यामुळे टीममध्ये योग्य मेसेज जाणार नाही. मात्र स्पर्धा अर्धी संपत आली आणि संघाचे सात सामने झाल्यानंतर ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात," असंही सेहवाग म्हणाला.

नक्की वाचा >> 29 बॉलमध्ये 61 धावा करुन सामना जिंकवणाऱ्या 'शशांक सिंह'मुळे प्रीती झिंटाला झालेला पश्चाताप, पण...

हार्दिकची मुंबईतही हुर्यो उडवल्याने आश्चर्यचकित

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने भारतीय क्रिकेट चाहते त्यांच्याच देशाच्या खेळाडूची हुर्यो उडवताना पाहून आश्चर्य वाटल्याचं म्हटलं होतं. "रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवावं की नाही याबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारतात बराच ड्राम सुरु आहे. त्यापैकीच एक म्हणजे हुर्यो उडवणे. भारतीयांना क्रिकेट फार आवडतं. मात्र त्यांना अशाप्रकारे मी हुर्यो उडवताना कधी पाहिलं नाही. त्यांच्या स्वत:च्या खेळाडूविरुद्ध अशी वागणूक मी यापूर्वी कधीच पाहिली नाही. तो अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला तेव्हा त्याची हुर्यो उडवण्यात आली. त्याने संघ सोडून मुंबईमध्ये तो दाखल झाल्याने तिथे असं घडलं असावं. मात्र हैदराबाद आणि त्यानंतर मुंबईमध्येही त्याची हुर्यो उडवली गेली. मुंबई इंडियन्सच्या ज्या चाहत्यांसाठी तो खेळतोय त्यांनीच त्याची हुर्यो उडवल्याचं पाहून मला आश्चर्य वाटलं," असं वॉर्नने क्लब पेरीरी फायरच्या पॉडकास्टमध्ये माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू गिलक्रिस्टबरोबर गप्पा मारताना म्हटलं. मुंबईचा पुढला सामना वानखेडेमध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध खेळवला जाणार आहे.