पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष

लंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली, भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं आव्हान ठेवलं आहे.   

राजीव कासले | Updated: Sep 11, 2023, 07:05 PM IST
पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली, कोहली-राहुलने धुतलं... विजयासाठी 357 धावांचं लक्ष title=

India vs Pakistan : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. पावसानंतर कोलंबोच्या मैदानावर चौकार  आणि षटकरांचा पाऊस पडला. विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांच बलाढ्य टार्गेट ठेवलं आहे. जगात सर्वात धोकादायक समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज टीम इंडियासमोर अक्षरश: निष्प्रभ ठरले.

टीम इंडियाने 2 विकेटच्या मोबदल्या 356 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा हा संयुक्त हायेस्ट स्कोर ठरला आहे. याआधी 2005 मध्ये टीम इंडियाने 256 धावा केल्या होत्या.

एशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार दहा सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार होता. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावलं. पण पाकिस्तानाचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी तब्बल 123 धावांची भागिदारी केली. पण रोहित शर्मा 56 आणि पाठोपाठ शुभमन गिलही 58 धावांवर बाद झाले आणि टीम इंडियाला लागोपाठ दोन धक्के बसले. पाकिस्तानी गोलंदाज पुन्हा वर्चस्व मिळवणार असं वाटत असतानाच पावसाने हजेरी लावली आणि संपूर्ण दिवसाचा खेळ वाया गेला. खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारतीय संघ 24.1 षटकं खेळला होता. 

हा सामना राखीव दिवशी पुन्हा खेळवण्यात आला. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पुढे खेळ सुरु केला. पण विराट-राहुलच्या मनात काही वेगळंच होतं. दोघांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु करत पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव आणला. यातून पाकिस्तान गोलंदाज सावरलेच नाहीत. विराट-राहुलने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 233 धावांची पार्टनरशिप केली. विशेष म्हणजे पाकिस्तानी गोलंदाजांनी राखीव दिवशी एकही विकेट घेता आली नाही. दोघांनीही शतकी खेळी केली.

विराट कोहलीने अवघ्या 94 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं हे त्याचं 47 वं शतक ठरलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 77 वं शतकं होतं. याबरोबर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात 13 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.

दुसरीकडे बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियात परतलेल्या के एल राहुलनेही दमदार शतकं ठोकलं. त्याने 106 चेंडूनत 111 धावा केल्या. यात 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.