'भारतात पुन्हा कधी, कधी, कधीच येणार नाही, इथली..'; परदेशी महिला खेळाडूची वादग्रस्त Insta स्टोरी

Dejana Radanovic Controversial Comments On India: तीन आठवडे भारतामध्ये पाहुणचार स्वीकारल्यानंतर मायदेशी म्हणजेच सर्बियामध्ये परत जाताना या महिला खेळाडूने इन्टाग्राम पोस्टमधून वादग्रस्त विधानं केली आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 10, 2024, 01:22 PM IST
'भारतात पुन्हा कधी, कधी, कधीच येणार नाही, इथली..'; परदेशी महिला खेळाडूची वादग्रस्त Insta स्टोरी title=
इन्स्टाग्राम स्टोरीमधून मांडलं मत

Dejana Radanovic Controversial Comments On India: प्रसिद्ध बॅटमिंटनपटू नोवाक जोकोविचच्या (Novak Djokovic) सर्बियाच्या राष्ट्रीय संघातील सदस्य असलेली डेजान राडानोविक (Dejana Radanovic) वादात सापडली आहे. डेजानने भारताबद्दल वर्णद्वेषी आणि वादग्रस्त विधानं केली आहेत. मागील 3 आठवड्यांपासून भारतात वास्तव्यास असलेली डेजान नुकतीच मायदेशी परतली. मात्र मायदेशी परत जाताना तिने भारताबद्दल इन्साटाग्राम स्टोरीमधून गरळ ओकली आहे.

काय म्हणाली ती भारताबद्दल?

अंतरराष्ट्रीय टेनिस फेड्रेशनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली डेजानने भारतातील अनेक गोष्टी खटकल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर भारतातून निघताना विमानतळावरुन तिने काही स्टोरी शेअर केल्या आहेत. एका स्टोरीमध्ये विमानतळाच्या फोटोवर 'भारताचा निरोप घेतेय, पुन्हा कधीच कधीच कधीच कधीच परत न येण्यासाठी,' असं डेजानने म्हटलं आहे. अन्य एका स्टोरीमध्ये डेजानने भारतामधील अन्न पदार्थ, वाहतुक कोंडी, स्वच्छता यासंदर्भातील आपले आक्षेप नोंदवले आहेत. माझ्या जेवणामध्ये आळ्या आढळल्याचा दावा डेजानने केला आहे. तसेच रस्त्यावर फार मोठ्याने गाड्यांचे हॉर्न वाजवले जात होते असंही डेजान म्हणाली आहे. ज्या ठिकाणी आपण वास्तव्यास होतो तेथील स्वच्छता फारशी चांगली नव्हती, असा आक्षेपही डेजानने नोंदवला आहे.

स्क्रीनशॉट व्हायरल

डेजानने पोस्ट केलेल्या या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. अनेक भारतीयांनी तिने ज्या पद्धतीचे शब्द वापरले आहेत त्यावरुन ही वर्णद्वेषी टीका असल्याचं मत नोंदवलं आहे. मात्र डेजानने आपला आक्षेप येथील व्यवस्थेला असून येथील लोकांना नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला भारतीयांचा सहवास आणि पाहुणचार फार आवडल्याचं तिने टीका होऊ लागल्यानंतर म्हटलं आहे.

अनेकांनी नोंदवला आक्षेप

डेजानच्या या विधानांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. भारताबद्दल हे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या डेजानला भारतात खेळण्याची कोणी बळजबरी केली होती का? असा प्रश्न भारतीयांनी विचारला आहे. तर बऱ्याच परदेशी नागरिकांनी भारतामध्ये खरोखरच वाहतुक, राहण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेसंदर्भातील समस्या आम्हालाही जाणवल्याचं म्हटलं आहे. काही जणांनी काही दिवसांपूर्वीच डेजानला वैदही चौधरी या भारतीय महिला टेनिसपटूने पराभूत केल्याने तिचा जळफळाट झाल्याचा टोलाही लगावला आहे.

वादानंतर स्पष्टीकरण

डेजानने स्पष्टीकरण देताना, माझी टीका ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नव्हती तर येथील परिस्थितीबद्दल होती. ज्या गोष्टींचा मला सामना करावा लागला त्याबद्दल होती असं म्हटलं आहे. मात्र अनेकांनी डेजानवर टीकेची झोड उठवत एवढ्या मोठ्या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूने आपआपसात सौदार्य राखण्याची, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका घ्यायला हवी असं म्हटलं आहे.