Tulsi Vivah 2022: भगवान विष्णुंना का करावं लागलं तुळशीसी लग्न? जाणून घ्या या मागची पौराणिक कथा

द्वादशीला हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह केला जातो. यावेळी द्वादशी 5 नोव्हेंबर 2022 या दिवशी तुळशी विवाह केला जाईल. हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते. 

Updated: Nov 3, 2022, 07:18 PM IST
Tulsi Vivah 2022: भगवान विष्णुंना का करावं लागलं तुळशीसी लग्न? जाणून घ्या या मागची पौराणिक कथा title=

Kartiki Ekadashi Tulsi Vivah 2022: कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी संबोधलं जातं. आषाढी एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णु चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. या चार महिन्यांना चातुर्मास संबोधलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य या काळात केलं जात नाही. कार्तिक महिन्यातील एकादशीला भगवान विष्णु निद्रारुपेतून जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला हिंदू मान्यतेनुसार तुळशी विवाह केला जातो. यावेळी द्वादशी 5 नोव्हेंबर 2022 या दिवशी तुळशी विवाह केला जाईल. हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहानंतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते. 

कधी आहे तुळशी विवाह?

तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला केला जाईल. ही तिथी 5 नोव्हेंबरला 6 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल आणि रविवारी संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे तुळशी विवाह 5 नोव्हेंबरला पार पडेल. या दिवशी सुर्यादयापूर्वी स्नान करून दिवे लावा. भगवान विष्णू यांचा गंगाजलाने अभिषेक करा. तसेच तुळशीपत्र अर्पण करा. या दिवशी भगवान विष्णुंचा शालिग्रामच्या रुपात तुळशीसोबत विवाह केला जातो.

तुळशी विवाहाची पौराणिक कथा

समुद्र मंथनावेळी जलंधर नावाचा राक्षस उत्पन्न झाला होता. त्याचा विवाह वृंदा नावाच्या कन्येसोबत झाला. वृंदा भगवान विष्णू यांची भक्त आणि पतिव्रता होती. त्यामुळे जलंधर राक्षसाची शक्ति दिवसेंदिवस वाढत चालही होती. देवगणांनी होणारा त्रास पाहून भगवान शंकराना साकडं घातलं. मात्र तेही जलंधर राक्षसाला पराभूत करू शकले नाही. तेव्हा सर्व देवगणांनी विष्णुंकडे धाव घेतली आणि ओढावलेल्या संकटाबद्दल सांगितलं. विष्णुंनी जलंधर राक्षसाचा वेष धारण केला आणि पतिव्रता वृंदाची पवित्रता नष्ट केली. त्यामुळे जलंधर राक्षसाची शक्ति कमी झाली. तेव्हा भगवान शिवाने जलंधर राक्षसाला मारलं. जेव्हा वृंदा ही बाब कळली तेव्हा तिने भगवान विष्णुंना दगड होण्याचा शाप दिला. तेव्हा विष्णु काळ्या दगडात म्हणजेच शालिग्राम झाले. त्याचबरोबर आपल्या पत्नीपासून वेगळे होतील असंही सांगितलं. राम अवतारात तसंच झालं.

Shani Margi: शनिदेवांची 17 जानेवारीपर्यंत 'या' राशींवर असेल कृपा, आर्थिक अडचणी होतील दूर

भगवान विष्णु शालिग्राम झाल्यानंतर देवगण भयभीत झाले. संकट पाहून देवी लक्ष्मीने वृंदाकडे प्रार्थना केली आणि श्राप मागे घेतला. तसेच वृंदा पती जलंधरसह सती गेली. राख झालेल्या ठिकाणाहून एक रोप आलं त्याला भगवान विष्णुंनी तुळशी असं नाव दिलं. भगवान विष्णुंनी तेव्हा तुळशीपत्राशिवाय प्रसाद स्वीकारणार नाही असं सांगितलं. पौराणिक कथेनुसार तेव्हापासून तुळशीचा विवाह शालिग्रामसोबत केला जातो.