आयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध

महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.

Updated: Apr 14, 2016, 09:54 PM IST
आयपीएल राज्याबाहेर न्यायला गावसकर, द्रविडचा विरोध title=

मुंबई: महाराष्ट्रामधल्या दुष्काळामुळे आयपीएलचे 13 सामने राज्याबाहेर न्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. यामुळे 30 एप्रिलनंतरचे राज्यातले सगळे सामने बाहेर खेळवावे लागणार आहेत. या निर्णयाचा माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि राहुल द्रवि़ड यांनी विरोध केला आहे. 

पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, ही गंभीर गोष्ट आहे. आयपीएलन खेळल्यानं ही समस्या सुटणार असेल तर आपण क्रिकेट खेळणंच सोडून दिलं पाहिजे असं राहुल द्रविड म्हणाला आहे. 

प्रत्येक वर्षी आयपीएलच्या आधी वाद निर्माण होतात, आयपीएलला गेल्या 9 ते 10 वर्षांपासून लक्ष्य केलं जात आहे, असं सुनिल गावसकर म्हणाले आहेत. पाण्याच्या समस्येमुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे, पण याचा संबंध क्रिकेटशी जो़डणं चुकीचं असल्याचं गावसकर यांना वाटत आहे. 

शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं पाहिजे असंही गावसकरांनी सांगितलं आहे. आयपीएल न झाल्यामुळे पाणी वाचणार आहे का ? असा सवालही गावसकर यांनी उपस्थित केला आहे. 

क्रिकेट थांबवल्यामुळे पाणी वाचणार असेल तर स्विमिंग आणि बागाही बंद करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुसऱ्या देशाविरोधात संबंधांवेळीही क्रिकेटला टार्गेट केलं जातं असा टोलाही गावसकरांनी लगावला आहे.