वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?

वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 11, 2013, 05:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत. त्यामुळे वडाळ्यातले दोन बळी दरडीचे की सरकारच्या उदासीनतेचे हा प्रश्न उपस्थित होतोय.
वडाळ्यात दरड कोसळून दोघांचा बळी गेल्यानंतर दरड कोसळण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मुंबईत दरड कोसळू शकतील अशी ३२७ ठिकाणं आहेत. धोकादायक दरडींच्या क्षेत्रात २२ हजार ४८३ झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. तरीही नगरविकास खात्यानं त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत दरड कोसळून २७० जणांचा मृत्यू झाला.
१९९६ या वर्षात घाटकोपरमध्ये दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला. तर २००० साली घाटकोपरच्याच आझादनगरात दरड कोसळून ७८ जण दगावले. २६ जुलै २००० च्या पुरात साकीनाक्यात दरड कोसळल्यानं ७३ जणांचा आणि २००९ साली ११ जणांचा बळी गेला. या क्षेत्रातल्या नागरिकांचं पुनर्वसन करण्याऐवजी संरक्षक भिंतीसाठी २०० कोटी खर्च करण्यात आले.
संरक्षण भिंत हा कायमस्वरुपी उपाय नाही. मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसनाचे आदेश देऊनही नगरसचिव विभागानं काहीही केलं नाही. नगरविकास विभाग मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात असल्यानं आता नगरविकासच्या मुख्यसचिवांवरच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.