ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आष्टी

आता ऑडिट बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचं. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या सुरेश धस यांचा हा मतदारसंघ.

Updated: Oct 7, 2014, 09:35 PM IST
 title=

बीड : आता ऑडिट बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचं. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रीमंडळात स्थान मिळवलेल्या सुरेश धस यांचा हा मतदारसंघ.

पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि हजरतशाह बुखारी यांचा दर्ग्यामुळे सर्वधऱ्मसमभावाची ओळख अवघ्या बीडला देणारी ही आष्टीची पुण्यभुमी... राजकियदृष्ट्याही कॉंग्रेस, नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीच्या ताब्यात  असलेला हा आष्टी विधानसभा मतदारसंघ.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -       
शिवसेना - अशोक दहिफळे
भाजप - भीमराव दोंदे
काँग्रेस - मिनाक्षी पाटील
राष्ट्रवादी - सुरेश धस
मनसे - वैभव काकडे

सत्ता कुणाचीही असो, आष्टीचा आमदार सत्तेत असतो अशी या मतदारसंघाची नव्यानं झालेली राजकिय ओळख.. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाच्या मतांवरच यशाची सगळी गणितं अवलंबून होती. 

२००९ च्या निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश धस यांना १ लाख १८ हजार ८४७ मते मिळाली होती. तर भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना ८४ हजार १५७ मतं मिळाली होती. या निवडणुकीत धस यांनी ३४ हजार ६९० मताधिक्यांनी विजय मिळवला होता.

लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपच्या गोपीनाथ मुंडेना १ लाख १९ हजार २५० मतं मिळाली होती. तर धस याच्याच मतदारसंघात १ लाख १० हजार ८८४ मते मिळाली होती. या मतदारसंघात मुंडे  यांना ८ हजार ३६६ एवढं मताधिक्य मिळालं होतं.

तीन टर्म आमदारकी भुषवलेल्या सुरेश धस यांना आपल्या विजयाचा विश्वास आहे. 

दोन वेळा भाजपच्या तिकीटावर, आणि एकवेळा राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडुन आलेल्या धस यांनी आपण विकासकामांचा धडाका लावल्याचा दावा केलाय.

आमदारांची कामे
- मतदारसंघात शेक़डो कोटींच्या विकासकामांचा दावा
- रस्ते, वीज. सिंचन तलावाची कामे अग्रक्रमाने पुर्ण
- सरकारच्या निधीचा योग्य आणि पुरेपुर वापर
- दुष्काळात राज्यातील सर्वात मोठी जनावरांची छावणी

समस्या आणि विरोधकांचे आरोप
- पाच वर्षापूर्वी प्रत्येक निवडणुकीत कुकडीचे पाणी आष्टी तालुक्यात आणण्याचे धस यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. 
- आष्टी तालुक्यात सातत्याने पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी सिंचनाचे मोठे प्रकल्प आणण्यात अयशस्वी, 
- राज्यमंत्री पदाचा लोकापेक्षा स्वतासाठीच वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो  
- आजही ग्रामीण भागात रस्ते , पाणी, शाळा खोल्या नसल्याचे चित्र आहे 
- गुंडगिरी वाढल्याचा आरोप होतो . 
- आष्टी वगळता पाटोदा आणि शिरूर तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतो 

मतदारसंघातील समस्यांमुळे मागील १५ वर्षातील धस यांच्या कारभारावर विरोधक टिकास्त्र सोडतायत

धस यांचा हा बालेकिल्ला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारला विरोधी लाटेचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. त्यातही विरोधकांकडून तगडा उमेदवार देणेही अपेक्षित आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढलेले सुरेश धस यांना यावेळी मतदार पुन्हा स्वीकारतील कि महायुतीचा विजय होईल हे आज तरी सांगणे कठीण आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.