धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द

तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 25, 2013, 11:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कटक
तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलियातील पाचव्या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग जमले होते. हा सामनाही पाण्यात जाण्याची चिन्हं दिसत होती.
२०११ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनाची संधी मिळालेल्या ओडिशा क्रिकेट असोसिएशननं आशा सोडल्या नव्हत्या. पावसानं विश्रांती घेतल्यास बाराबती स्टेडियमचं मैदान कोरडं करून सामना खेळवण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. परंतु, पाऊस थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यानं त्यांनी अनौपचारिकपणे सामना रद्द झाल्याचं जाहीर केलंय.
भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील शनिवारचा सामना रद्द झाल्याचं आम्ही आत्ताच अधिकृतपणे जाहीर करू शकत नाही. परंतु, तिकिटाचे पैसे परत करण्याच्या तारखा आम्ही जाहीर केल्या आहेत. म्हणजेच हा सामना तसा अधिकृतपणे रद्दच झालाय, असं ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आशीर्वाद बेहरा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं. उद्या सकाळी ११ वाजता पंच आणि सामनाधिकारी मैदानाची पाहणी करून सामना खेळवायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.