कसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र

भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 6, 2012, 10:04 AM IST

भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
२६/११ च्या मुंबईवरील हल्लयाचा गुन्हेगार कसाब याला अद्याप फाशी न झाल्यामुळे शिवसेनेने नवनिर्वाचित राष्च्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवलं आहे. यात कसाबच्या फाशीबद्दल विचारणा केली आहे.”सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही आता न्यायाची प्रतिक्षा करत आहोत. कसाबला लवकरात लवकर फाशी देऊन आम्हाला न्याय द्यावा.” असं शिवसेनेने राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दहशतवाद्यांच्या बाबतीत निर्णय घेताना वेगळा न्याय नको. त्यांना दयेचा अर्ज करण्याची मुभा नसावी, असं राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात शिवसेने म्हटलं आहे. ‘२००१ साली अफजल गुरूला फाशीची शिक्षा होऊनही अद्याप त्याला फासावर लटकवलं नाही. कसाबच्या बाबतीतही हेच घडत आहे. दहशतवादी आपल्याला ‘सेफ टार्गेट’ समजतात. त्यांचा हा दृष्टीकोन बदललाच पाहिजे.’ असं शिवसेनेच्या खासदारांनी लिहिलेल्या पत्रात राष्ट्रपतींना सूचित केलं गेलं आहे. अनंत गीते, संजय राऊत, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, भारतकुमार राऊत, सुभाष वानखेडे, गणेशराव दूधगावकर, गजानन बाबर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी या पत्रावर स्वक्षरी केलेली आहे.