'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन'

राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 12, 2013, 09:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, सलूम्बर (उदयपूर)
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय. यावेळी त्यांनी जनतेलेला देशात आणि राजस्थानात काँग्रेसलाच निवडणून देण्यासाठी मत द्या, अशी याचना केलीय.
गरिबी ही ‘मानसिक अवस्था’ आहे असं सांगणाऱ्या राहुल गांधींना अचानक गरिबी पटू लागलीय. ही गरिबी खाण्या-पिण्यापासून आहे हेही त्यांना समजलंय. त्यामुळेच की काय? ‘तीन-चार रोटी खाइए और कांग्रेस की सरकार लाइए’ अशी घोषणाही त्यांनी राजस्थानात दिलीय.
विरोधी पक्षांवर टीका करतच राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. देशाचा विकास होणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. परंतु, या विकासाचा लाभ ‘आम आदमी’ला पहिल्यांदा मिळणं गरजेचं आहे. विकासात हातभार लावणाऱ्या मजूरांचं पोट भरलेलं असतानाच देश पुढे जाऊ शकेल, असं त्यांनी म्हटलंय.
‘देशाचं स्वप्न हे काँग्रेसचं स्वप्न आहे. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन. मी आम आदमीच्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छितो. भारत हा एक पुष्पगुच्छ आहे. जिथे प्रत्येक पद्धतीचं फूल दिसायला हवं. मग, तो कोणत्याही जातीचा असो, आदिवासी असो, त्याचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. अन्न सुरक्षा योजना मंजूर करून संसदेनं गरिबांना अन्न उपलब्ध करून दिलंय. आता देशात कुणीही भुकेलेल्या अवस्थेत उपाशी झोपणार नाही’ असं राहुल गांधी म्हणतात.

‘पूरी रोटी खाएंगे, सौ दिन काम करेंगे, दवाई लेंगे और कांग्रेस को जिताएंगे’ अशा घोषणा करण्याचे आदेश त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनाही दिल्यात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.