जगनमोहन पाठोपाठ आजपासून चंद्राबाबू नायडूंचं उपोषण!

स्वतंत्र तेलंगणा विरोधात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आजपासून नवी दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 7, 2013, 10:15 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
स्वतंत्र तेलंगणा विरोधात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आजपासून नवी दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. आंध्र प्रदेशातल्या संकटाला सोनिया गांधी कारणीभूत असल्याचा आरोप जगनमोहन यांनी केलाय. शिवाय राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतंत्र तेलंगणाचा घाट घालून सरकार आंध्रातल्या जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन घटक पक्षांनी युपीए सरकारवर हल्लाबोल केलाय. हा निर्णय घेण्याआधी सरकारनं सीमांध्रातल्या जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं, असा घरचा आहेर राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांनी युपीए सरकारला दिलाय. तेलंगणाच्या मुद्यावर काँग्रेसची भूमिका पाहता जगनमोहन यांच्या आरोपात तथ्य असल्याचं भाजप नेते कीर्ती आझाद यांनी म्हटलंय.

दुसरीकडे स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावरुन आता वातावरण चांगलंच तापलंय. सीमांध्रातल्या जनतेचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय. विजयनगरम इथं ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जमावाला आटोक्यात ठेवण्यासाठी विजयनगरममध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.