सुहासिनी लोखंडे यांना भाजपचा व्हीप!

भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना भाजपनं व्हीप बजावला. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला.

Updated: Mar 5, 2012, 08:28 PM IST

www.24taas.com, ठाणे

भाजपच्या ठाण्याच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना भाजपनं व्हीप बजावला. महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश बजावण्यात आला. ठाणे महापालिकेतले गटनेते संजय वागुले यांनी हा व्हिप बजावलाय. सुहासिनी लोखंडे यांच्या घराच्या दारावर व्हिपची नोटीस चिकटवण्यात आली. सुहासिनी लोखंडे भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या गेल्या 24 तारखेपासून बेपत्ता आहेत.

 

दरम्यान, ठाण्यातल्या सत्ता संघर्षातून भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे अपहरण झाल्याचा आरोप होत असताना हा वाद आता हायकोर्टात पोहचला आहे. भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केलीय.  त्यावर उद्या सकाळी सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीत कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

हेबियस कॉर्पस म्हणजे कोर्टाने पोलिसांना आदेश देऊन अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास लावून त्याला कोर्टासमोर हजर करण्यास संदर्भातील कारवाई...

 

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी जोरदार चुरस आहे. उद्या महापौरपदासाठी निवडणूक होणारयं. महापालिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक 53 जागा आहेत. तर मित्रपक्ष भाजपकडे 8 आणि रिपाईकडे 1 जागा आहे. बसपाचे दोन नगरसेवक आणि दोन अपक्षांनी महायुतीला पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे महायुतीच्या जागांची संख्या 66 होते आहे.

 

दुसरीकडे राष्ट्रवादीकडे 34 जागा आहेत. काँग्रेसकडे 18 जागा आहेत. पाच अपक्षांनी आघाडीला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे आघाडीचं संख्याबळ 57 वर पोहचलय. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला 66 चा आकडा गाठण्यासाठी त्यांना 9 जागांची आवश्यकता आहे. महापालिकेत मनसे सदस्यांची संख्या 7 आहे. या निवडणूकीत मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा दर्शवलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

महायुतीतर्फे महापौरपदासाठी हरिश्चंद्र पाटील यांना तर उपमहापौरपदासाठी मिलिंद पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. आघाडीतर्फे महापौरपदासाठी नजीब मुल्ला आणि उपमहापौरपदासाठी भरत चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण झाल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. आघाडी आणि युतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्यायते. आता सत्तास्थापनेसाठी महायुती आणि आघाडीची रणनिती कशी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.