बिहार भाजपमध्ये कलह, बिहारी बाबूंनी केलं `खामोश`!

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 14, 2014, 03:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर होताच घमासान सुरू झालंय. २५ उमेदवारांच्या या यादीत पटना साहिबचे खासदार अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नसल्यानं ते नाराज असल्याचं समजतंय.
बिहारी बाबूंच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटना साहिब शत्रुघ्न सिन्हांची पहिली आणि शेवटची आवड आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण पटना साहिबची सीट सोडणार नसल्याचं शत्रुघ्न सिन्हांचं म्बणणं असल्याचं कळतंय.
तर दुसरीकडे भाजपचे फायरब्रांड नेते आणि मोदींचे खासमखास मानले जाणारे गिरिराज सिंह यांच्या नावाची घोषणा नवादासाठी झालीय. मात्र गिरिराज सिंह यांना नवादाहून निवडणूक लढवायची नाहीय. त्यांनी बेगुसराय इथली सीट पक्षाकडे मागितली होती. पण बेगुसरायची सीट नवादाचे खासदार भोला सिंह यांना देण्यात आलीय. दरम्यान, गिरिराज सिंह यांनी आपण नवादाहून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय.
मोदींच्या दुसरे जवळचे आणि राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरसिया हे देखील नाराज आहे. चौरसिया काराकाट सीटवर आपली दावेदारी सांगतायेत. पण सूत्रांच्या मते ही सीट एनडीएतील उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला देण्यात येणार आहे. त्यामुळं चौरसिया यांनीही आपली नाराजी हायकमांडपर्यंत पोहोचलीय. सध्याचे १२ पैकी ११ खासदारांची उमेदवारी कायम ठेवलीय मात्र बिहारी बाबूंच्या सीटवर सस्पेंस कायम आहे. यासर्वांवरून हेच दिसतंय की बिहार भाजपमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झालाय. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा सद्धा आपलं मत स्पष्ट मांडत नसले तरी ते अस्वस्थ आहेत, असंच दिसून येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.