अखेरच्या रणजीसाठी सचिन सज्ज, सर्वांच्या नजरा सचिनवर!

लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 27, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, लाहली, हरयाणा
लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.
रणजीमध्ये कायमच सचिनचा रेकॉर्ड चांगला राहिलाय. गेल्या सिझनमध्ये फॉर्मशी झगडत असतानाही सचिन रणजी खेळताना दिसला होता. इतकंच नाहीतर गेल्या वेळी मुंबई टीमला रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचवण्यात सचिननं मोलाचं योगदान दिलं होतं. विशेष म्हणजे या मॅचमध्ये सचिननं सेंच्युरी झळकावल्यास क्रिकेट फॅन्सना मोफत समोसा देण्यात येणार आहे. त्यामुळं आता शेवटच्या टेस्टआधी होणाऱ्या रणजीमध्ये सचिनच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईच्या टीमसमोर पहिल्या सामन्यात हरयाणाचं आव्हान आहे.
अजित आगरकरच्या निवृत्तीमुळं मुंबईला नव्या मोसम नव्यानं सुरूवात करावी लागणार आहे. आगरकरच्या निवृत्तीनंतर मुंबईचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आलं आहे. मात्र पहिल्या तीन सामन्यांसाठी झहीर खान नेतृत्त्वाची धुरा सांभाळेल. मुंबईच्या टीममध्ये वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर सारखे खंदे शिलेदार आहेत. पण सचिन तेंडुलकर आणि झहीर खानच्या सहभागानं मुंबईची ताकद दुपटीनं वाढली आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत आपली अखेरची टेस्ट मॅच खेळून सचिन क्रिकेटला गुडबाय करणार आहे. आणि त्या मालिकेआधी हरयाणाविरुद्ध रणजी सामन्यात खेळून आपले हात मोकळे करणार आहे. त्यासाठी त्यानं वानखेडे स्टेडियमवर कसून सरावही केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.