धक्कादायक, बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तकं पडून, रद्दीत देण्यासाठी काढले टेंडर

शाळेची पुस्तकं आता रद्दीत... 426 मेट्रीक टन पुस्तके रद्दीत 

Updated: Aug 18, 2021, 03:20 PM IST
धक्कादायक,  बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तकं पडून, रद्दीत देण्यासाठी काढले टेंडर title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तकं पडून आहेत. आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले. 426 मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी टेंडर  काढले आहे. पेपर मिल्सकडून मागवण्यात टेंडर आले आहे.  बालभारतीच्या नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून आहेत.  पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल इथल्या गोदामात ही पुस्तके पडून आहेत. 

 मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मात्र शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली आहेत.  शाळा बंद असूनही बालभारतीने पुस्तके का छापली ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  पुस्तके छापली, मात्र शाळा सुरू नसल्याने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आली नाहीत. त्यामुळे ही सर्व पुस्तके बालभारतीच्या विविध गोदामांमध्ये पडून आहेत. 

बालभारतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तक छापली आणि ती आता रद्दीत द्यावी लागत आहेत. या पुस्तक छपाईवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला असून शासनाचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाच्या या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल इथे उपस्थित होतो.