मुंबईतील 'हा' लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडा; राष्ट्रवादीची मागणी

राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे. 

Updated: Oct 7, 2018, 05:17 PM IST
मुंबईतील 'हा' लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडा; राष्ट्रवादीची मागणी title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत लोकसभेची आणखी एक जागा लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. लवकरच राष्ट्रवादीकडून काँग्रेसपुढे हा प्रस्ताव मांडण्यात येईल. 

मुंबईत सध्या काँग्रेस लोकसभेच्या पाच जागा आणि राष्ट्रवादी एक जागा लढवते. राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे. मात्र, आता मुंबईत आणखी एक जागा द्यावी अशी मागणी या राष्ट्रवादीच्या बैठकीतून करण्यात आली. 

उत्तर पश्चिम मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई यापैकी एका जागेवर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. २०१४ साली उत्तर पश्चिम मतदारसंघातून गुरुदास कामत तर उत्तर मध्य मुंबईमधून प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. 

या दोनपैकी एक जागा मिळावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रयत्नशील आहेत.  दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी संजीव नाईक, तर कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आनंद परांजपे यांच्यासह गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे.