Mumbai Local Train : 15 ऑगस्टपासून एवढे प्रवासी करणार रेल्वे प्रवास?

मुंबई लोकल प्रवासाची आकडेवारी आली समोर 

Updated: Aug 9, 2021, 09:50 AM IST
Mumbai Local Train : 15 ऑगस्टपासून एवढे प्रवासी करणार रेल्वे प्रवास? title=

मुंबई : दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा १५ ऑगस्टपासून राज्य सरकार देत असले तरी बहुतांश मुंबईकरांना अजूनही लोकल प्रवासापासून दूरच राहावे लागणार असल्याचे लसीकरणाच्या आकडेवारीवरून दिसून येतंय. त्यामुळे मुंबईकरांना गणपतीपर्यंत तरी रेल्वे प्रवासापासू लांब राहावं लागणार आहे. 

मुंबईत १८ लाख ६९ हजार ५७२ जणांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. यातील अत्यावश्यक कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर्सची संख्या आहे २ लाख ९६ हजार १५६  इतकी. या लोकांना अगोदरपासूनच लोकल प्रवासाची मुभा आहे. (Vaccine Certificate on WhatsApp : आरोग्य मंत्र्यांनी सांगितल्या 'या' महत्वाच्या स्टेप्स) 

६० वर्षांवरील ६ लाख ३७ हजार ३०१ ज्येष्ठ नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. परंतु या वयोगटातील अधिकतर लोक घरीच असतात. या गटातील रोज लोकल प्रवास करणा-यांचे प्रमाण नगण्य असेच असणाराय.

४५ ते ५९ वयोगटातील ७ लाख ९१ हजार १२६ आणि १८ ते ४४ वयोगटातील १ लाख २८ हजार ३९ जणांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. या दोन्ही वयोगटातील मुंबईकरांना मात्र लोकल प्रवासाची मुभा दिल्याचा फायदा होणार आहे. म्हणजे दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास निम्या मुंबईकरांना या निर्णयाचा फायदा होणार नाही. तसंच ज्या निम्या लोकांना फायदा होणाराय, ते सर्वच लोकल प्रवास करतील याची खात्री नाही. 

एक डोस घेतलेल्यांची संख्या मुंबईत ५६ लाख ४५ हजार ९४५ इतकी प्रचंड आहे. ज्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कामावर जाणाऱ्या मोठ्या वर्गाला रेल्वे प्रवासापासून मुकावं लागणार आहे. रेल्वेने प्रवास करता येत नसल्यामुळे रोड प्रवासाची संख्या वाढली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना ट्रॅफिकला सामोरं जावं लागत आहे.