नाणार प्रकल्पाच्या कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

राज्यात नाणारचा वाद पेटणार

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 04:35 PM IST

मुंबई : नाणार प्रकल्पाच्या मुंबईतल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रकल्प कार्यालयात जाऊन या कार्यालयाची तोडफोड केली आहे. मुंबईतील ताडदेवमध्ये नाणारचं हे कार्यालय आहे. त्यामुळे राज्यात नाणारचा वाद आता आणखी चिंघळण्याची शक्यता आहे. काही झाले तर कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. सरकारला काय करायचं आहे ते सरकारने करून घ्यावं. पण, हा प्रकल्प कोकणात होणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सरकारला दिला होता.

नाणारला विरोध वाढला

सध्या राज्यभर गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत करार केल्यानं या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध अधिकच तिव्र झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत एक कणभर देखील जमीन रिफायनरी प्रकल्पाला देणार नसल्याचं इथले स्थानिक सांगत आहेत. दरम्यान, शिवसेना, मनसे, काँग्रेसनेही या वादात उडी घेत प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. नाणारला होणारा सर्वपक्षीय विरोध विचारात घेता भाजप एकाकी पडला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प आता राहणार की, गुंडाळला जाणार याबबात औद्योगिक क्षेत्र आणि राजयकीय वर्तुळासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाणारप्रश्नी भाजप एकाकी

या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारकडून हा करार झाल्यानंतर विविध पक्षांचे बडे नेते आता नाणारच्या दौऱ्यावर येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांची एक टीम १९ एप्रिल रोजी नाणारवासियांच्या भेटीला येणार आणि त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील नाणारमध्ये २३ एप्रिल रोजी स्थानिकांना भेटण्यासाठी आणि आपली नाणारबाबतची भूमिका मांडण्यासाठी दौरा करणार आहेत.

शरद पवारही नाणार दौऱ्यावर

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील १० मे रोजी नाणारच्या दौऱ्यावर येणार असून, तेही स्थानिक जनतेच्या भावना जाणून घेणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांनी देखील आपला नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचं जाहीर केलंय.. त्यामुळे भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवलाय.