आघाडीत बिघाडी होणार? काँग्रेसच्या 25 आमदारांनी उचललं 'असं' पाऊल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र  

Updated: Mar 30, 2022, 02:09 PM IST
आघाडीत बिघाडी होणार? काँग्रेसच्या 25 आमदारांनी उचललं 'असं' पाऊल title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसचे (Congress) आमदार मंत्र्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसमधले 25 आमदारांची नाराजी महाविकास आघाडीसाठी अचडणीची ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या 25 आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलंय. 

महाविकास आघाडीतले काँग्रेसचे आमदार स्वतः.च्याच मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पत्र लिहून नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. हे आमदार सोनियांची भेट घेणार असल्याचंही समजतंय. 

महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि नेत्यांवर भाजपने घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या 25 आमदारांनीही नाराजीचा सूर आळवला आहे. या नाराज आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे मंत्री आमदारांचं ऐकूण घेत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असा आरोप नाराज आमदारांनी केला आहे. 

मतदारसंघात विकासकामं करायची आहेत, पण त्याकडे मंत्री दुर्लक्ष करत करत असून याचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये होईल, त्यामुळे सोनिया गांधी यांनी यात हस्तक्षेप करावा अशी विनंती या नाराज आमदारांनी केली आहे. 

नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
एकीकडे काँग्रेसचे आमदार नाराज असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. किमान समान कार्यक्रमावर आधारीत सरकारने काम करावे, अशी आठवण पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे. दलित, ओबीसी समाजाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पटोलेंनी केली आहे.