मुंबईत संततधार, चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी

Landslide in Chunabhatti area of ​​Mumbai : मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

Updated: Jul 6, 2022, 12:43 PM IST
मुंबईत संततधार, चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी title=

मुंबई : Landslide in Chunabhatti area of ​​Mumbai : मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संततधार पावसाचा फटाक मुंबईतील चुनाभट्टी येथील तीन घरांना बसला आहे. चुनाभट्टी येथे दरड कोसळली असून डोंगराचा काही भाग घरांवर आल्याने घरांचे नुकसान झाले. या घटनेत तीन जण जखमी झालेत.

चुनाभट्टी येथे डोंगर खचल्याने दरड घरांवर आली. यात तिघे जखमी झालेत.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात तर मुंबई पोलीस ही घटनास्थळी पोहोचले आहेत.

समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता

मुंबईकरांनो सावधान, पावसामुळे समुद्राला उधाण आलंय. त्यातच दुपारी सव्वाचार वाजता समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवर जाऊ नका. मुंबई किना-यावर आज सव्वा चार वाजता भरती येणार आहे. 

पावसामुळे जागोजागी मुंबईत पाणी तुंबतंय. त्यामुळे मुंबई मनपाच्या नालेसफाईची पोलखोल झालीय. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. नाले स्वच्छ न केल्यानं पाणी साचतंय. त्यामुळे रस्ते पाण्यात गेलेत. 100 टक्के नालेसफाईचा दावा करणारी मनपा, प्रशासन आता जेसीबी लावून कचरा साफ करत आहेत. 

मुसळधार पावसामुळे मुंबईचा पवई तलाव ओसंडून वाहताना दिसतोय. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. तसंच शाळकरी विद्यार्थी सुद्धा तलावाच्या पाण्यात मौज-मस्ती करताना दिसतायत. 

 वाहतुकही काही प्रमाणात मंदावली

मुंबईत पावसाची संततधार सरु असल्यामुळे वाहतुकही काही प्रमाणात मंदावलीय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळतेय. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक सध्या सुरु आहे.

चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत पाणी साचले आहे. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. इथल्या रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी भरलंय. इथल्या इमारती, घरं यामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी भरलंय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. 

 जोरदार पावसामुळे मुंबईच्या गांधी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. इथली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून काम करण्यात येतंय. साचणा-या पाण्याचा वेगानं उपसा करण्यात येतोय.