एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा

 दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Updated: Oct 8, 2019, 09:43 PM IST
एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा   title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनुच्छेद ३७०, बांगलादेशी घुसखोर, भुमीपुत्रांना प्राधान्य अशा विविध विषयांवर एकूण ३५ मिनिटे भाषण केले. तसेच शिवसेनेचा जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध झाला नसला तरी त्यांनी या मंचावरून काही आश्वासनेही महाराष्ट्राला दिली आहेत. यामध्ये दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

युतीचे सरकार आले होते तेव्हा एक रुपयात झुणका भाकर ही योजना आणली गेली होती. या योजनेला जनमानसातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. आता शिवसेनेतर्फे दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात विद्यार्थीनींची होणारी छेडछाड, अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता तिथल्या विद्यार्थ्यांना बससेवा देण्याचे आश्वासनही उद्धव यांनी यावेळी दिले. 

तीनशे युनीट पर्यंतचा घरगुती वीज वापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार असल्याचेही त्यांनी मंचावरून जाहीर केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्त करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

एका महिन्यात २ विजयादशमी आहेत. एक आजची आणि दुसरी २४ तारखेची असे उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिरचा निकाल लागेल म्हणतायत. महिनाभरात, नाहीतर आमची मागणी आहे की विशेष कायदा करून राम मंदिर बांधा असे आवाहन देखील उद्धव यांनी यावेळी केली. जे वचन आम्ही जनतेला देतो, ते आम्ही पाळतो. म्हणून आम्हाला राम मंदिल हवंय. सत्ता मिळवण्यासाठी मंदिर नकोय. ही देशाची मागणी असल्याचेही ते म्हणाले.  ३७० कलम काढणे हे शिवसेनेचे स्वप्न असल्याचे सांगत देशातून बांगला घुसखोरांना हाकलून काढा, भुमीपुत्रांना प्राधान्य मिळायलाच हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महत्त्वाचे मुद्दे 

- सत्तेच्या लालसेसाठी युती केलेली नाही
- शिवसेना कुणासमोरही वाकत नाही, हा झुकणारा मावळा नाहीय. एकतर मरेन किंवा मारेन
- जोपर्यंत त्यांचे टार्गेट आम्ही आहोत तर तोवर आमचेही टार्गेट तेच आहेत
- काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले तरी हरकत नाही, पण तुमचा नेता कोण ? 
- मगरीच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते, पण अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू
- धरणात पाणी नसते तेव्हा काय का़य केले असते
- शरद पवारांनी लढाई केली व ईडी घाबरली म्हणतात. पण सुडाचे राजकारण राज्यात चालत नाही
- ईडी आल्यावर तुम्हाला सुडाचे राजकारण वाटते
- २००० साली बाळासाहेबांवर का खटला दाखल केला हाेता ? काय गुन्हा होता ? ९२-९३ साली त्यांच्या कंपूचेच सरकार हाेते. तुमच्या मर्दांच्या जोरावर इथला हिंदू वाचलाय
- सामनाच्या अग्रलेखावर गुन्हा दाखल केला
- हिंदुना वाचवणे हा गुन्हा होता का
- देशातील एकमेव संघटना जी समाजकारण व राजकारण करतं, जी विजयादशमी शिवतीर्थावर साजरी करते
- ही शस्त्रे माझ्यासमोर पसरली आहेत
- विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी निघालोय
- अनेक मित्र शिवसेनेला मिळतायत. देशावर प्रेम करणारे मुस्लिमदेखील आम्हाला मिळतायत.
- धनगरांच्या काठीला तलवारीची धार लागली पाहिजे
- सत्ता तर मला पाहिजेच, कुठल्याही परिस्थिती हवीत
- कुणाला वाटलं शिवसेना झुकली. आम्ही भाजपची अडचण समजून घेतली
- हां जी, हां जी करणारा हा महाराष्ट्र नाही
- पाठीत वार करणा-याचा काेथळा बाहेर काढणारी ही वाघनखं आहेत
- अस्थिर लोकसभा टाळण्यासाठी युती केली. मी काँग्रेसच्या मागे कधीच ताकद देणार नाही
- प्रेमही उघड करू व वैरही उघड करू, म्हणून युती केली