रुग्ण वाढ गंभीर, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Updated: Feb 15, 2021, 05:53 PM IST
रुग्ण वाढ गंभीर, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार title=

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंता वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हे गंभीर असल्याचं म्हटलं आहे. 'मी सगळ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांना, खासदार, आमदारांना सांगितले आहे की रुग्ण वाढ गंभीर आहे. अनेक देशात रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन करायला लागले, आपलीही वाढ गंभीर आहे. हे सगळं काळजी वाढवणारे आहे.'

'उद्या मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागेल, लोकांनी आता निर्णयाची मानसिकता ठेवावी, कारण कोरोना वाढ गंभीर आहे.' असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. नागपूर, अमरावती, नाशिक आणि पुण्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळं चिंता करण्यासारखी परिस्थिती राज्यात पुन्हा निर्माण झाली आहे. 

पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, नवे हॉटस्पॉट बनत आहेत. काही शहरांत पुन्हा लॉकडाऊन होणार का अशा चर्चा आता सुरु आहेत.  राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या रविवारी पुन्हा 4 हजारांहून अधिक झाली आहे. रविवारी राज्यात 4 हजार 092 नव्या रुग्णांचं निदान झालं, तर 40 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला.

मुंबईमध्ये ६४५, पुण्यामध्ये ३५६, नाशिकमध्ये ६२४, नागपूरमध्ये ४५५, तर अमरावतीत ३९९ एवढे रुग्ण वाढले. त्यामुळं राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५ हजार ९६५ वर पोहोचली आहे. सर्वाधिक ६ हजार २१६ अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये आहेत.