यवतमाळचे ठाणेदार अनिलसिंह गौतम पुन्हा एकदा वादात

Updated: May 18, 2018, 08:07 PM IST

मुंबई : यवतमाळच्या पुसद शहरचे ठाणेदार अनिलसिंह गौतम पुन्हा एकदा वादात सापडले आहे. त्यांनी अटकेतील आरोपीला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  भीमा तुकाराम हाटे असं मृत तरुणाचं नाव आहे. ठाणेदार गौतम यांनी मारहाण करून भीमा चा जीव घेतला अशी तक्रार करीत त्याचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते.

यवतमाळ च्या पुसद शहर चे ठाणेदार अनिलसिंह गौतम पुन्हा एकदा वादात सापडले आहे. त्यांनी अटकेतील आरोपीला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  भीमा तुकाराम हाटे असे मृत तरुणाचे नाव असून त्याला मारहाणीनंतर जखमी अवस्थेत सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले होते.  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ठाणेदार गौतम यांनी मारहाण करून भीमा चा जीव घेतला अशी तक्रार करीत त्याचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषणाला बसले होते.

आंबेडकर वॉर्ड पुसद येथे राहणाऱ्या भीमा हाटे ला एका तरुणीच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी अटक केली होती. ३० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर भीमा हाटे याची प्रकृती बिघडल्याने त्याला सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अटके दरम्यान ठाणेदारांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे अशी मागणी करीत नातेवाईकांनी पुसद, यवतमाळ आणि सावंगी मेघे इथे आंदोलन केले. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी ठाणेदार गौतम यांना मुख्यालयी बोलाविले. गौतम यापूर्वी दारव्हा येथे ठाणेदार असतांना त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राषण केले होते त्यात एकाचा मृत्यू झाला होता.