आता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार

Viral Palghar Ro-Ro Jetty: विरार ते पालघर प्रवासासाठी आता दीड तासांचा अवधी लागतो मात्र, आता हे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 26, 2024, 04:01 PM IST
 आता समुद्रातून करा प्रवास! विरार-पालघर अंतर 15 मिनिटांत गाठता येणार title=
virar- palghar Ro-Ro ferry will start sail after 18 months

Virar Palghar Ro-Ro Jetty: अलीकडेच वसई ते भाईंदरपर्यंत रो-रो सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता पालघर ते विरारपर्यंत आणखी एक रो-रो सेवा सुरू होणार आहे. या रो-रो सेवेमुळं पालघर ते विरारपर्यंतचा प्रवास 15 ते  20 मिनिटांवर येणार आहे. सध्या या प्रवासासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो. मात्र, जलमार्गाने हे अंतर कमी होणार आहे. तसंच, यामुळं इंधनाचीही बचत होणार आहे. 

विरार ते पालघर रोरो सेवेसाठी विरारमधील नारंगी जेट्टी तयार झाली आहे. तर, पालघरमधील खारवाडेश्वर रोरो जेट्टी उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्या आहेत. या जेट्टीसाठी शासनाने 223.68 कोटींचा निधी मंजुर केला आहे. सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ही जेट्टी सुरू झाल्यानंतर प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. 

वसई-विरारकरांना रस्ते मार्गाने पालघर गाठण्यासाठी एक ते दीड तासांचे अंतर पार करावे लागते. सध्या अहमदाबाद महामार्गाने पालघरला जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. तसंच, वाहतुक कोंडीत अडकल्यास वेळ अधिक लागू शकतो. सकाळी व संध्याकाळी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो अशावेळी चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसंत, रेल्वेने पालघरला जाण्यासाठीही तितकाच वेळ लागतो. त्यात विरारहून पालघरला जाण्यासाठी लोकलदेखील कमी धावतात. अशावेळी रोजच्या चाकरमान्यांची लोकलला अधिक गर्दी असते. अशावेळी विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी सोयीचा ठरू शकतो. 

तसंच, पालघर येथे जिल्हा मुख्यालय आहे. त्यामुळं वसई-विरारच्या नागरिकांना सरकारी कामांसाठी पालघरला जावेच लागते. अशावेळी रेल्वे किंवा रस्तेमार्गे प्रवास करण्याऐवजी हा पर्याय खूपच सोयीचा ठरु शकणार आहे. विरार ते पालघर रस्ते मार्गे साधारण 60 किमी आहे. तर, तर वसई ते पालघर रस्स्ते साधारण 56.1 किमी आहे. मात्र, जलमागे हे अंतर फक्त 3 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळं वेळेची बचत होणार आहे. 

विरारची नारंगी रोरो जेट्टीचे काम सुरू झाले आहे तर, पालघरच्य खारवाडेश्वर रोरो जेट्टीला आता सर्व प्रकारच्या मंजुऱ्या मिळाल्या आहेत. येत्या 18 महिन्यात म्हणजे दीड वर्षात हे काम सुरू होणार आहे. तर, लवकरच जलमार्ग सुरू होणार आहे. 

वसई ते भाईंदर समुद्रात रो रो सेवेला सुरुवात

वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करणारी रो रो सेवा आज पासून प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या या जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी इतकी असणार आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाचा हा समुद्री मार्ग असणार आहे. ही सेवा ३ महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली असून भरती व आहोटीच्या वेळी या फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे. आज या समुद्री मार्गातील रो रो सेवेची सुरुवात झाल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनी या बोटीतून प्रवास केला.