केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचा GST परतावा दिला, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

 Maharashtra GST Return : महाराष्ट्राच्या तिजोरीत GSTचा परतावा आला आहे. केंद्र सरकाने महाराष्ट्राच्या तब्बल 14 ,145 कोटी रुपयांचा GST परतावा दिला आहे.  

Updated: Jun 1, 2022, 12:00 PM IST
केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचा GST परतावा दिला, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : Maharashtra GST Return : महाराष्ट्राच्या तिजोरीत GSTचा परतावा आला आहे. केंद्र सरकाने महाराष्ट्राच्या तब्बल 14 ,145 कोटी रुपयांचा GST परतावा दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारला केंद्राच्या नावाने बोट दाखवता येणार नाही, असा टोला भाजपकडून लगवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, हा मागील परतावा आला आहे. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आधीच कपात केली आहे. त्यामुळे याचा आणि त्याचा संबंध लावणे योग्य होणार नाही.

जीएसटीचे पैसे हे पेट्रोल आणि डिझेलचे पैसे कमी करण्यासाठी मिळालेले नव्हते. आम्हीपण पैसे कमी केले आहेत. ते मागच्या काळात येणारे पैसे होते. हे आपल्यालाही माहिती आहे. ते पैसे आता मिळाले आहेत. यामुळे याचा आणि त्याचा संबंध प्रत्यक्ष येत नाही. वेगवगळ्या समस्या असतात. राज्याचा गाडा चालवायचा आहे. इतर अडचणीत असणाऱ्या माणसाला मदत झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

केंद्राने GSTची रक्कम महाराष्ट्राला (Maharashtra) द्यावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडून केली जात होती. अखेर केंद्रकडून जीएसटी भरपाईपोटी महाराष्ट्राला 14 हजार कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून 31 मे 2022 पर्यंतची जीएसटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना वितरीत करण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रासह गोवा  राज्यालादेखील जीएसटीचा (Goa GST) परतावा देण्यात आला आहे. 31 मे 2022 पर्यंत देय असलेली जीएसटीची भरपाई दिल्याने आता राज्यांना येत्या आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाचा भार कमी होण्याची शक्यता आहे.  

केंद्राने महाराष्ट्राचा तब्बल 14 ,145 कोटी रुपयांचा GST परतावा दिला आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारला सवाल केला आहे.  उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारे ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का, असे भाजपने म्हटले आहे.