राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात

सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे... सध्या अधिवेशनाचा कामकाज दोन आठवड्याचं निश्चित करण्यात आलं असलं तरी हे कामकाज पुढेही वाढू शकण्याची चिन्ह आहे..

Updated: Dec 10, 2017, 09:17 AM IST
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे... सध्या अधिवेशनाचा कामकाज दोन आठवड्याचं निश्चित करण्यात आलं असलं तरी हे कामकाज पुढेही वाढू शकण्याची चिन्ह आहे... त्या अनुषंगाने विधिमंडळ सचिवालयाने २९ डिसेंबरपर्यंततची तयारी केलीये.. 

अधिवेशनाची तयारी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ११ डिसेंबरपासून सुरु होत आहे... या दृष्टीने विधिमंडळ सचिवालयाने सर्व तयारी पूर्ण केलीये... विधिमंडळ सचिवालयाला मिळालेल्या लक्षवेधी सूचना आणि प्रश्न हे शेती आणि शेतकरी विषयांशी निगडित आहेत... यात कर्जमाफी,फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू,बोंड अळीचा प्रादुर्भाव,कापूस ,धान संत्रा आदी विषयांवरील प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे... त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर हे अधिवेशन गाजणार असल्याचे चित्र आहे..

आतापर्यंत दोन्ही सभागृहात तीन हजारांच्या जवळपास लक्षवेधी सूचना सादर केल्या आहेत... तसेच शंभराहून अधिक अर्धा तास चर्चा तसेच ठराव मांडले आहेत... आतापर्यंत २२ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित झाले असले तरी विरोधी पक्ष नेत्यांनी हे कामकाज आणखी पुढे वाढवावे असे पात्र दिल्याने अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. 

चोख सुरक्षाव्यवस्था

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आलीये. नागपुरात मेट्रो आणि सिमेंट रस्त्याचं काम सुरु आहे... त्यात अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलनं आणि मोर्चे येत असल्यानं वाहतूक व्यवस्थेला त्याचा फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आलीये. सुरक्षेसाठी अडीच हजार पोलिसांची अतिरिक्त कुमक नागपुरात दाखल झाली आहे... शिवाय हेल्मेट कॅमेरा, ड्रोन्स, व अडीचशे सीसीटीव्हीची नजर शहरावर राहणार आहे. 

१२ डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे... तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ आज नागपुरात दाखल होणार आहेत...एकूणच नागपुरात सोमवार पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून संबंधित यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.