छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नौदलाचा खुलासा

यावरुन राजकारणही सुरु झालंय. पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्याने केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 26, 2024, 11:52 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नौदलाचा खुलासा title=

Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय.. त्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. हा पुतळा नौदलानं उभारला होता. या घटनेनंतर नौदलाने याबाबत खुलासा केला आहे. नौदलाने एक निवेदन जारी केले आहे. 

हा पुतळा नौदलानं उभारला होता. मात्र ताशी 45 किलोमीटर पेक्षा जास्त वेगानं या ठिकाणी वारे वाहत होते, त्यामुळे पुतळा पडला असं जिल्हा प्रशासनानं सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान उद्या नौदलाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटेनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार आणि संबंधित तज्ञांसह, नौदल घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा तपास करणार आहे.  लवकरात लवकर पुतळ्याची दुरूस्ती करुन, पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी पावले उचलण्यासाठी एक पथक नियुक्त केले जाणार असल्याचे नौदलाने निवदेनात म्हंटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जबाबदारी असणा-या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची जबाबदारी असणा-या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. ठेकेदार मेसर्स आर्टिस्टी, कंपनी मालक जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पुतळा उभारणीच्या कामात असलेल्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची जबाबदारी नौदलाची होती अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलीय. तसंच समुद्राच्या खा-या हवेमुळे ही घटना घडल्याचा अंदाजही त्यांनी बोलून दाखवलाय..  येत्या दोन महिन्यांत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल, असंही चव्हाण यांनी सांगितलंय.