अखेर 'सारथी' संस्थेला स्वायत्तता बहाल

 राज्य सरकारने पुन्हा 'सारथी'ला स्वायता बहाल करण्यात आल्याने मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 

Updated: Oct 16, 2020, 09:26 AM IST
अखेर 'सारथी' संस्थेला स्वायत्तता बहाल  title=

मुंबई : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी 'सारथी' संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर २०१९ ला 'सारथी'ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिला होता. आता गरज प्रत्यक्ष कृतीची अन्यथा पुन्हा संघर्ष अटळ आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले होते. आता राज्य सरकारने पुन्हा 'सारथी'ला स्वायता बहाल करण्यात आल्याने मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 

'सारथी' संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. दरम्यान, 'सारथी' ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर सरकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण येऊन मर्यादा आल्या होत्या. निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यांसह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्या होत्या, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी म्हटले होते.

सारथीची स्वायत्तता पुनर्स्थापित करण्यात यावी या मागणी साठी वर्षभर आंदोलने झाली करण्यात आली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता 'सारथी'ला स्वायता बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, सारथी बंद होणार नाही असे सांगताना आठ कोटींचा निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती.  सारथी संस्थेला १ हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सारथीबाबत चर्चा होती. सारथी बंद होणार, सारथीकडे महाविकास आघाडीचे लक्ष नाही, अशी सातत्याने टीका होत होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत चर्चा झाली. सारथीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ती बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. आता सारथीला स्वायता बहाल करण्यात आली आहे.

मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरु करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन ही संस्था अधिक चर्चेत आली. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. तसेच आपण ओबीसी असल्याने मला टार्गेट करण्यात येत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.