सलग चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे.

Updated: Aug 29, 2017, 09:16 AM IST
सलग चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ title=

रत्नागिरी : सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 389.80 मिमी पाऊस पडला आहे. तर सरासरी 43.31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गणेशोत्सव म्हटला की, बाहेरगावी असलेला कोकणातील प्रत्येक चाकरमानी हमखास गावी येतोच. त्या निमित्तानं नातेवाईकांकडे जाणं होतं. या सणाच्या दिवसात पाऊस नसेल. तर चार ठिकाणी सहज फिरता येतं. सध्या मात्र गेले चार दिवस पडत असलेली पावसानं चाकरमान्यांच्या आंनदावर पाणी फेरलं आहे.

सलग चार दिवस पाऊस पडत असल्यानं बाहेर कुठे म्हणजे नातेवाईकांकडे जाताही येत नाही आहे. संपूर्ण जिल्ह्यात हीच स्थिती आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून, राजापूरमध्ये तब्बल 65.50 मिमी पाऊस पडला आहे. त्या खालोखाल चिपळूण तालुक्यामध्ये 48.40 पाऊस पडला आहे. तर मंडणगड, दापोली, खेड आणि लांजा या तालुक्यांमध्येही सरासरी 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.