सकारात्मक बातमी । हेरवाडकर गावाची दखल, विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासन निर्णय

Positive news : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. आता हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचं शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले आहे. 

Updated: May 19, 2022, 08:16 AM IST
सकारात्मक बातमी । हेरवाडकर गावाची दखल, विधवा प्रथा बंद करण्यासाठी शासन निर्णय  title=

मुंबई : Positive news : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला.  विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केल्यानंतर गावकऱ्यांसह सरपंच यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता हेरवाड ग्रामपंचायतीच्या या ठरावाचं शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पती निधनानंतर पाळल्या जाणाऱ्या प्रथा बंद होणार आहे.

21 व्या शतकातील ऐतिहासिक निर्णय, कोल्हापुरात 'या' गावातील विधवा प्रथा बंद

'झी 24 तास'ने सर्वात आधी याबाबतची बातमी दाखवली होती. आपण कितीही प्रगत झालो तरी आजही पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणं, गळ्यातील मंगळसूत्र तोडणं, हातातील बांगड्या फोडणं, पायातली जोडवी काढणं, यासारख्या प्रथांचं पालन केलं जातं. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर, सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामसभेनं घेतला. 'झी 24 तास'ने याबाबतचं वृत्त दाखवलं होतं. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने या ठरावासाठी शासन निर्णय घेतला आहे. 

हेरवाड गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद

 21 व्या शतकातील नवा आदर्श समाजासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात विधवा प्रथा बंद कायमची बंद करण्यात आली आहे. यासाठी गावाने पुढाकार घेत महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या प्रथा आता बंद करण्यात आली आहे. आज मातृदिनी हा महत्वाचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. याला महिला अनुमोदक होत्या.  प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी हेरवड गावाने हा मोठा पुढाकार घेतला आहे. 

 
हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेला तीव्र विरोध करण्यात आला होता. ग्रामपंचायतीमध्ये विधवा प्रथेविरोधात ठराव करण्यात आला. हा ठराव मांडण्यात आला नाही तर तो बहुमताने मंजूर करण्यात आला.  गावात यापुढे पतीच्या निधनानंतर विधवा प्रथेचे कोणतेच कार्यक्रम होणार नसल्याचा ठराव केला गेला. ग्रामसभेत सर्वानुमते विधवा प्रथेला विरोध करण्यात आला होता. ग्रामसभेत सूचक आणि अनुमोदक महिला राहिल्या. आता ही प्रथा या गावातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श अन्य गावे घेतील, असा हा ऐतिहासिक निर्णय आहे.