शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Updated: Jun 11, 2020, 07:46 AM IST
शेतकरी बांधवांना भरीव मदत मिळण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - कृषीमंत्री दादा भुसे title=
संग्रहित छाया

मुंबई / अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणमधील चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानापासून तर शेतीचे, नारळाच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी धीर धरावा,विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घोषित करणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी रायगड येथे दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा दिवसभर पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदी उपस्थित होते,

नुकसानीची सविस्तर आकडेवारी पंचनाम्यासह लवकरात लवकर सादर करण्यात यावी.  जवळपास २५ ते ७५ वर्षांपूर्वीची सुपारी, आंब्याची झाडे, फळबागा नष्ट झाल्या असून पुढची काही वर्षे हीच झाडे शेतकरी बांधवांना उत्पादन देणार होते.  आता नवीन रोपे लावून फळबाग उभ्या केल्या जाणार असल्या तरी साधारण पाच ते सात वर्षानंतरच शेतकरी बांधवांना त्यातून उत्पादन मिळू शकणार आहे.  म्हणूनच या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत.  पंचनामे करताना त्या शेतकऱ्याचे किती क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे, त्याच्या फळझाडांची संख्या किती होती, या नोंदींशिवाय त्याच्या फळझाडांच्या वयाचीही नोंद पंचनाम्यात करावी, असे स्पष्ट निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना मंत्री दादा भुसे यांनी दिल्यात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वी जे काही विहित नियम आहेत त्या विहित नियमांच्या पेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.

नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची जी काही फळझाडे आहेत ती फळझाडे बाजूला करणे, यासाठी  शेतकरी बांधवांना मोठा खर्च येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला रोजगार द्यावा. जेणेकरुन त्या फळबागांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, इकडे तिकडे पडलेली झाडे बाजूला करणे हे एक मोठं  काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल. ज्या फळांची झाडे अर्धवट तुटलेली आहेत त्यांचे पुनर्जीवन करता येईल का? याची चाचपणी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मदतीने केली जाणार आहे. जिथे पूर्णपणे झाडे नाहीशी झालेली आहेत त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून, विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या रोपांच्या सहाय्याने आणि कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनांच्या माध्यमातून त्या बागा पुन्हा उभ्या करण्याचे काम हाती घेण्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.