क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका, नितेश राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

क्यार चक्रीवादळामुळे कोकणातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Updated: Oct 27, 2019, 07:38 AM IST
क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका, नितेश राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट title=

सिंधुदुर्ग :  जिल्ह्याला क्यार चक्रीवादळाचा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यासंदर्भात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. 

क्यार चक्रीवादळामुळे कोकणातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लांबलेल्या परतीच्या पावसानं जिल्ह्यातील भातशेतीला चांगलाच फटका बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे लष्करी अळीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कापणी तत्काळ करणं आवश्यक होतं. परंतु पावसानं त्यावर पाणी फेरलं आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक परिणाम झाला आहे.

अरबी समुद्रात असलेलं 'क्यार' चक्रीवादळ पश्चिम दिशेला सरकलं असलं तरी याचे परिणाम कोकणच्या किनारपट्टी भागात जाणवत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्गात अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. पावसामुळे शेतीच मोठं नुकसान झालं आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मालवण आणि देवगड तालुक्याला बसला आहे.