राज्यातील 'तो' शटडाऊन म्हणजे सायबर हल्ला, गृहमंत्र्यांचे संकेत

 ही घटना सायबर हल्ल्याचा प्रकार 

Updated: Jan 25, 2021, 07:38 PM IST

अमर काणे झी २४ तास नागपूर : काही दिवसांपूर्वी  मुंबईसह राज्यात वीज पुरवठा खंडीत झाला होती. ही घटना सायबर हल्ल्याचा प्रकार होता, असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत. नागपुरात पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

10 ऑक्टोबर 2020 रोजी कधी नव्हे ते मुंबईचा वीज पुरवठा खंडीत झाला. एरव्ही अखंडित होणारा वीज पुरवठा खंडीत झाल्यानं मुंबईत प्रचंड गोंधळ माजला.. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट आणि अदानी पॉवरलाही काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. 

सायबर गुन्हेगारांनी हा हल्ला करुन वीजपुरवठा यंत्रणा निकामी केल्याचं आता समोर आलाय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही तो सायबर हल्लाच होता असं सांगितलंय. हा सायबर हल्ला नियोजनपूर्वक झाल्याचा दावा सायबरतज्ज्ञांनी केलाय.

आतापर्यंत कंपन्या आणि सरकारी वेबसाईट्स सायबर गुन्हेगारांचं लक्ष्य होतं. आता थेट वीज यंत्रणाच सायबर गुन्हेगारांच्या रडारवर आलीय. त्यामुळं आता महावितरणलाही सायबर सिक्युअर यंत्रणा उभारावी लागणार आहे.