Raj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Raj Thackeray On disfigured the festival : राज्याच्या अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 1, 2023, 04:54 PM IST
Raj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान title=
Raj Thackeray

Raj Thackeray's X Post : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत सर्वांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. यंदाच्या गणपती उत्सवात राज्याच्या अनेक भागातून मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी, मिरज, चंद्रपूर या भागात विसर्जनाला गालगोट लागल्याचं दिसून आलंय. तर अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. शासनाचे सर्व नियम ढाब्यावर बसवल्याचं दिसून आलंय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि यापुढे पण गरज पडली तर करत राहू. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की, असं राज ठाकरे म्हणतात.

पण, या उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे,डॉल्बी यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४-२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे, असं राज ठाकरे म्हणतात.

आज एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि दुसरीकडे जेंव्हा त्याचं सार्वजनिक स्वरूप येतं तेंव्हा त्यातल्या वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे. 

उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात पारंपरिक ढोलताशा पथकं, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोकं पण येतील. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी. 

शहरातील होर्डिंग्स याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि मी या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर, या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल. 

आणखी वाचा - "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

दरम्यान, हिंदू सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करताना जर काही चुकीचं आढळलं तर आम्ही पुढाकार घेऊ हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचं नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.