Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला असून आयपॅडच्या (iPad) सहाय्याने बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे.   

Updated: Mar 9, 2023, 02:35 PM IST
Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं title=

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीला छेद दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपॅडच्या (iPad) माध्यमातून बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या माध्यमातून आपलं सरकार हायटेक असल्याचं एकाप्रकारे दाखवून दिलं आहे. 

अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, संभाजीनगर येथील उद्यानांचा विकास केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी, शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी दिले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये दिले जातील असं फडणवीसांनी सांगितलं. आंबेगाव (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी दिले जाणार आहेत. 

तसंच 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12000 रुपयांचा सन्माननिधी दिला जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर टाकली आहे. प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. 

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार हफ्ता भरणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
- 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान
- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

- आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
- या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, 'काजू फळ विकास योजना'
 
- 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार
 - आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार
नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना निवारा-भोजन
- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा
- शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
 - विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार