आमदार बाळू धानोरकर यांचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

Updated: Mar 20, 2019, 06:27 PM IST
आमदार बाळू धानोरकर यांचा शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'  title=

चंद्रपूर :  आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी हा राजीनामा सोपावला आहे. बाळू धानोरकर चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आमदार आहेत.  वरोरा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसच्या जाण्याच्या हालचाली आधीपासूनच सुरू होत्या. 

बाळू धानोरकर यांनी आपल्या शिवसेनेच्या पदांचाही राजीनामा दिला आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसचे लोक संपर्कात होते पण पुढे काही झाले नाही. आता अपक्ष निवडणूक लढवण्याचीही माझी तयारी असल्याची प्रतिक्रिया 'झी 24 तास'ला दिली. निवडणूक लढवायची असल्याने मी माझ्या पदाचे राजीनामे दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

राज्यात आणि केंद्रात सेना सत्तेत असूनही  पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना  सेनेच्याच मंत्र्यांकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते ही खंत बाळू धानोरकर यांच्या मनात होती. त्यांनी अनेकदा ही खंत उघडपणे बोलूनही दाखवली होती. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत आपण एकटय़ाने किल्ला लढवला मात्र एकही मंत्री या ठिकाणी प्रचाराला न आल्याची खंतही त्यांनी नगरपरिषद निवडणुकी दरम्यान बोलून दाखवली होती. मी सेनेच्या मंत्र्यांना निरोप दिले, त्यांनी वेळही दिली होती पण प्रत्यक्षात मात्र कोणी आले नसल्याचा घरचा आहेर त्यांनी सेनेला दिला होता. ही शिवसैनिकांची फसवणूक असल्याचेही ते म्हणाले होते. एकंदरीत काय तर बाळू धानोरकर यांचा शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय अचानक झाला नाही.