रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

राजीव कासले | Updated: Apr 15, 2024, 01:58 PM IST
 रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल title=

Loksabha 2024 :रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरूच आहे. या जागेवरून महायुतीनं 'वेट अँड वॉच'चं धोरण स्वीकारल्याची माहिती सुत्रानं दिलीय. भाजपकडून नारायण राणे (Narayan Rane) आणि शिंदे गटाचे किरण सामंत (Kiran Samant) हे दोघेही या जागेसाठी उत्सुक आहेत. मात्र, शिंदे गटानं नारायण राणेंच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केल्याची माहिती मिळतेय. भाजप एकीकडं घराणेशाहीचा विरोध करत आहे आणि दुसरीकडे राणेंच्या एका घरात किती जणांना तिकीट देणार, असा सवालच शिवसेनेनं उपस्थित केल्याचं सूत्रांकडून कळतंय. किरण सांमत यांनी देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही. तिढा कायम असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.

माघार घेतल्याचीही रंगली होती चर्चा
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांनी माघार घेतल्याचीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्यांच्या एका पोस्टमुळे ही चर्चा होती. पण उदय सामंत यांनी हा दावा फेटाळला होता. आपण किरण सामंतांजवळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क केला आणि ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती उदय सामतांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली होती. इतकंच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा कायम असल्याचंही सांगितलं होतं. 

अर्ज भरण्याचा दिवस
रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीनं अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. मविआ मात्र आज अर्जही दाखल करतील. विनायक राऊत ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरतील. रायगडमधून अनंत गिते देखील आज अर्ज भरतील.

फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल
महायुती उमेदवारांची घोषणा होत असताना अनेक ठिकाणी उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. ही नाराजी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. फडणवीसांनी अनेक नेत्यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: 4 दिवसात फडणवीसांना नागपुरात भेटण्यासाठी नेत्यांची, इच्छुकांची, उमेदवारांची रिघ लागलीय.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांनी आज नाराज उत्तमराव जानकरांशी चर्चा केली. माढातील महायुतीचे नेते नागपुरात फडणवीसांच्या भेटीला गेले होते. यावेळी फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून, यासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती उत्तमराव जानकरांनी दिलीय. सोलापुरातून उमेदवारी न मिळाल्याने जानकर हे नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका हा भाजपला सोलापूर आणि माढ्यामध्ये बसू शकतो, यामुळे त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत..

विरोधकांकडून टोला
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. यावरून ठाकरेंच्या सेनेतील नेते अंबादास दानवेंनी महायुतीला टोला लगावलाय. अनेकजण मुंडावळ्या बांधून तयार आहेत. मात्र आमच्यासोबत लढायला त्यांना योग्य उमेदवार मिळेना, अशी टीका त्यांनी केलीय.